पुढारी विशेष : विकास गामणे, प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातून चक्क 'गाढवं' गायब झाली असून, दुसरीकडे मात्र तब्बल ६ हजार मोकाट कुत्र्यांची नवीन फौज वाढल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एकेकाळी ग्रामीण भागात ओझे वाहण्यासाठी हक्काचा सवंगडी मानला जाणारा गाढव हा प्राणी आता नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला असताना, गल्लोगल्ली मात्र 'श्वानगँग'चा सुळसुळाट झाल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
देशातील २१ वी पशुगणना २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात मोबाईल ॲप आणि अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून पार पडली. या गणनेचा अंतिम अहवाल अद्याप प्रक्रियेत असला, तरी समोर आलेल्या प्राथमिक आकडेवारीने नाशिककरांचे डोळे पांढरे केले आहेत. २० व्या पशुगणनेत नाशिकच्या ग्रामीण भागात १७२ गाढवांची नोंद झाली होती. मात्र, अवघ्या पाच वर्षांत ही संख्या ३० ने घटून थेट १४२ वर आली आहे.
'गाढव विरुद्ध कुत्रे' असे व्यस्त चित्र चिंतेत भर घालणारे आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे ग्रामीण भागात लहान मुले, वृद्ध आणि रात्रीच्या प्रवाशांवर होणाऱ्या हल्ल्यांचे सत्र वाढले आहे. त्यामुळे आता केवळ कागदावर डिजिटल आकडे मोजण्यापेक्षा, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी नाशिककरांमधून होत आहे.
ग्रामीण भागातील वाढते यांत्रिकीकरण, मिनी ट्रॅक्टर्स आणि 'छोटा हत्ती' सारख्या मालवाहू गाड्यांमुळे गाढवांचा वापर कमालीचा घटला आहे. परिणामी, हा शांत प्राणी आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे उपयुक्त पशूंची संख्या घटत असताना, दुसरीकडे मात्र मोकाट आणि भटक्या कुत्र्यांनी नाशिक जिल्हा वेठीस धरला आहे. २० व्या पशुगणनेत जिल्ह्यात ३४ हजार ५३३ भटक्या कुत्र्यांची नोंद झाली होती.
२१ व्या पशुगणनेत हा आकडा तब्बल ५ हजार ९११ ने वाढून ४० हजार ४४४ वर जाऊन पोहोचला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीवर दरवर्षी लाखो रुपयांचा चुराडा केला जातो. मात्र, तरीही कुत्र्यांची संख्या ४० हजारांच्या पार जाने, हे नसबंदी मोहिमेचे अपयश आणि प्रशासकीय अनास्था चव्हाट्यावर आणणारे आहे. भारतात दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते.
२० वी पशुगणना: १७२
२१ वी पशुगणना: १४२
नर गाढव: ७३
मादी गाढव: ६९
ग्रामीण भागात आता छोट्या गल्लीमध्ये किंवा डोंगराळ भागातही जाऊ शकणारे मिनी ट्रॅक्टर्स, पावर टिलर आणि 'छोटा हत्ती' सारख्या छोट्या मालवाहू गाड्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाल्या आहेत.
या वाढत्या वाहनांमुळे कमी वेळेत जास्त वाहतूक करणे शक्य झाले आहे.
कुंभारकाम करणारे व्यावसायिक किंवा बांधकाम क्षेत्रातील मजूर जे पूर्वी वाहतुकीसाठी गाढवांचा वापर करायचे, त्यांनी आता वाहतुकीचे आधुनिक पर्याय निवडले आहेत.
गाढवांना पाळण्याचा, त्यांच्या चाऱ्याचा खर्च आणि त्या तुलनेत त्यांच्याकडून मिळणारा रोजगार कमी झाल्यामुळे पशुपालकांनी गाढवे पाळणे कमी केले आहे.