LCB transfer news Pudhari News Network
नाशिक

Nashik news: एलसीबीची खांदेपालट का? नेमके राजकारण नेत्याचे की लॉबीचे?

Nashik LCB transfer news: स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) अधिकाऱ्यांच्या सततच्या बदल्यांमुळे पुन्हा एकदा वादंग

पुढारी वृत्तसेवा

जळगाव: जळगाव जिल्हा हा नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. राजकारण असो, सामाजिक कारण असो वा पोलीस प्रशासनातील एखादा निर्णय असो, तो थेट राज्यापर्यंत गाजल्याशिवाय थांबत नाही. म्हणूनच "जळगाव जिल्हा" हे नाव कायम चर्चेत राहते. नुकत्याच झालेल्या घटनांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) अधिकाऱ्यांच्या सततच्या बदल्यांमुळे पुन्हा एकदा वादंग उठले आहे.

वर्षभरात एलसीबीचे दोन अधिकाऱ्यांची बदली झाली, त्यानंतर तिसऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. परंतु, त्यांनी पदभार स्वीकारून कामास सुरुवात करून अवघे चार-पाच दिवस झाले नसतानाच पुन्हा बदलीचे वारे वाहू लागले. हे वारे नेमके नेत्यांकडून वाहतात आहे का, की काही लॉबी त्यामागे कार्यरत आहे, हा मोठा प्रश्न जिल्ह्यात उभा राहिला आहे. यातून थेट अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत असून, गुन्हेगारांना मात्र मोकळे रान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जळगाव म्हटलं की पाळधी, चाळीसगाव, अमळनेर, मुक्ताईनगर हे तालुके नेहमी चर्चेत राहतात. विशेषतः मुक्ताईनगरातून काही बातमी बाहेर पडली तर ती थेट राज्यस्तरावर चर्चेत येते. त्यात आता एलसीबी अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून राजकारण आणि अधिकाऱ्यांतील लॉबीवाद उघड होताना दिसत आहे.

वर्षभरात दोन बदल्यांनंतर नुकतेच तिसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली. त्यांनी कारवाईची धडाकेबाज सुरुवात करून गुटखा माफियांवर कारवाई केली, गुन्हेगारी टोळ्यांना हादरे दिले. गुन्हेगारांच्या नावाने दहशत निर्माण होईल अशी पावले उचलली. इतक्या कमी वेळात ही धडाकेबाज कामगिरी सुरू झाली असतानाच त्यांच्या बदलीचे वारे सुरू झाले. मग प्रश्न उभा राहतो की, अधिकारी चुकला कुठे? की कुणाच्या हिताला धक्का लागल्याने बदल्यांचा खेळ सुरू झाला?

आज ज्या अधिकाऱ्यांच्या धडाकेबाज कारवायांमुळे खुलेआम सुरू असलेले धंदे बंद झाले, ते लपून-छपून चालवले जात आहेत. गुन्हेगारीवर आळा बसू लागला, तेव्हाच बदलीच्या चर्चा रंगू लागल्या. यामुळे पुढचा मोठा प्रश्न असा की – गुन्हेगारांवर आळा घालण्याची प्रक्रिया थांबवली जाणार का?

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नेहमीच काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना संधी दिली आहे, त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान केला आहे. मग अचानक या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह कोण उभे करत आहे? जर असेच बदल्यांचे वारे वाहत राहिले, तर उद्या गुन्हेगारच पोलीस स्टेशन चालवतील, आणि त्यांच्या मर्जीनुसार अधिकारी बसवले जातील, अशी भीती व्यक्त होत आहे. गुन्हेगारांना आळा बसू लागला तितक्यात त्यांच्या बदलीचे वारे सुरू झाले आहेत. कामगिरी जोमात सुरू असतानाच अशा चर्चा उधाणास आल्या तर पुढे गुन्हेगारांना खरोखरच आळा बसेल का, हा प्रश्न आता जिल्हावासीयांसमोर उभा राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT