नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातून नाशिकचे जागतिक पातळीवर ब्रॅण्डिंग करण्याचे निर्देश देतानाच या कुंभमेळ्याच्या माध्यमातून देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी महाकुंभ तयार करण्याचे व या महाकुंभामध्ये देशातील तसेच राज्यातील मंदिरे, तीर्थक्षेत्रे, सांस्कृतिक वारशाचे भाविकांना दर्शन घेता येईल, असे मोठे संमेलन केंद्र (कन्व्हेन्शन सेंटर) उभारावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्वाचे
- अपघातमुक्त कुंभमेळा करणार.
- आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)चा वापर करणार.
- एका 'क्यू आर' कोडवर भाविकांना सुविधांची सर्व माहिती.
- गोदावरी नदी स्वच्छ करणार.
- मलजलनिस्सारण केंद्रे वाढविणार.
- सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर.
- चार ते पाच कोटी साधू-संत, भाविकांचा अंदाज.
- विमानतळाला जोडणारे रस्ते जोडणार.
- समृद्धी महामार्गाचा पुरेपूर वापर.
- आरोग्यसेवा भक्कम करणार.
-----------
2027 मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पूर्वचर्चा तसेच तयारीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि.१७) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्यातील वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन, साधुग्राम, नदी आणि उपनद्यांचे शुद्धीकरण, पायाभूत सुविधा तसेच इतर अनुषंगीक विकास कामे आदींबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी सिंहस्थ आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी नाशिकला जागतिक पटलावर आणण्यासाठी, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कुंभमेळ्याचे ब्रॅण्डिंग करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. नाशिक- त्र्यंबकेश्वर रीलिजियस कॉरिडोअरची निर्मिती करून नाशिक रीलिजिअस हब म्हणून विकसित करावे. प्रयागराजच्या धर्तीवर सुरक्षित कुंभमेळा होण्यासाठी नियोजन करावे. गोदावरी नदीकाठ विकासासाठी प्रोत्साहन द्यावे. या कुंभमेळ्यासाठी देशविदेशातून पर्यटक दर्शनसाठी येत असतात. पर्यटक तसेच भाविकांच्या सोयीसाठी नाशिक येथे 8 ते 10 हेलिपॅड तयार करण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, समृद्धी महामार्गाने येणाऱ्या भाविकांना इगतपुरी ते नाशिक या मार्गाला प्रशस्त करून नाशिक शहराला जोडणाऱ्या सर्व मार्गांचे क्राँक्रीटीकीकरण तसेच रुंदीकरण करण्यात यावे. जे मार्ग 2027 पर्यंत बांधणे शक्य आहे, असेच बांधकाम हाती घेण्यात यावे. इगतपुरी ते त्र्यंबकेश्वर हा रस्ता चारपदरी करण्याबरोबरच वाढवण, मुंबई, शिर्डी, संभाजीनगर तसेच रिंग रोड आदी अद्ययावत तसेच निर्माण करणे. नागरिक तसेच भाविकांच्या सुविधेसाठी राम काल पथ बरोबरच त्र्यंबकेश्वर येथे रीलिजिअस कॉरिडोअर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्या.
या बैठकीस जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने आदी उपस्थित होते.
नाशिक येथे साधुग्रामकरिता अतिरिक्त जमिनीची आवश्यकता असल्याने तेथील जमिन संपादित करण्यात यावी. येथे नगररचना परियोजना करून हस्तांतरणीय विकास हक्क स्थापित करून ते नगरपालिकेकडे हस्तांतरीत करावे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले आहेत, अशा ठिकाणी तत्काळ अतिक्रमण हटवावीत, अशाही सूचना त्यांनी दिल्या. या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील भाविकांच्या सुरक्षेसंदर्भात पोलीसांकडून आढावा घेतांना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या रहिवासांबाबत योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर जागोजागी लागणारे सीसीटीव्ही, बॅरिकेडिंग, सार्वजनिक ध्वनिक्षेपण यंत्रणा राबविण्याचे निर्देश दिले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा अपघात मुक्त करण्याबरोबरचं माहिती तंत्रज्ञानासह आर्टीफिशिअल इंटेलिजन्सचा पुरेपूर वापर करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून, शासनाने पुरविलेल्या सिंहस्थातील सुविधा भाविकांना मिळण्यासाठी क्यु-आर कोड उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. साधुग्रामकरिता संपादित केलेल्या जागेवर वृक्षतोड न करता साधुंच्या निवासाची व्यवस्था करावी. तसेच कुंभमेळ्यादरम्यान कुठेही चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या.