नाशिक : श्री कपालेश्वर मंदिरात दानाच्या पैशांवरून झालेल्या वादप्रकरणी मंदिरातील सर्व दानपेट्या सील करण्याचा आदेश कायम ठेवत मुंबई उच्च न्यायालयाने गुरव परिवाराची याचिका फेटाळली आहे. या निर्णयामुळे दानपेट्यांच्या पारदर्शक हिशेवाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मागणीला बळ मिळाले आहे.
श्री कपालेश्वर मंदिरात २० सप्टेंबर २०२४ रोजी अविनाश गाढे व हेमंत ऊर्फ पप्पू गाडे यांच्यात दानाच्या रकमेवरून जोरदार धुमश्चक्री झाली होती. या घटनेनंतर मंदिरातील दानपेट्यांचा हिशेब पारदर्शक पद्धतीने जाहीर करण्यात यावा, यासाठी मंदिराचे भाविक देवेंद्र युवराज पाटील व राहुल बोरीचा यांनी धर्मादाय उप-आयुक्त यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जाची दखल घेत धर्मादाय उप आयुक्त न्यायालयाने २५ सप्टेंबर २०२४ ला मंदिरातील सर्व दानपेट्या सील करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाविरोधात मंदिराशी संबंधित गाढे, भगवान, जगताप व शेवाळे या गुरव परिवाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सदर याचिकेचे कामकाज योग्य प्रकारे पुढे न नेण्यात आल्याने उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत याचिका फेटाळून लावली. या प्रकरणात संस्थान व तत्कालीन विश्वस्त यांच्या वतीने अॅड. आनंद पांडे यांनी काम पाहिले, तर संस्थानचे माजी अध्यक्ष अॅड. अक्षय कलंत्री यांनी व्यक्तिशः लक्ष घालून सातत्याने पाठपुरावा केला. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मंदिरातील आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल टाकले गेल्याचे भाविकांमध्ये बोलले जात आहे.
मंदिरातील दानपेट्या सील करण्याच्या विरुद्ध गुरव परिवाराकडून मुंबई उच्च न्यायालयात केलेली याचिका फेटाळण्यात आली असून, आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. या निर्णयामुळे दानाच्या रकमेचा हिशेब भाविकांना मिळण्याचा मार्ग प्रशस्त झालेला असून, संस्थानच्या योजनानिर्मितीसाठी देखील ही बाब पूरक ठरणार आहे.अॅड. अक्षय कलंत्री, अध्यक्ष, संस्थान कपालेश्वर महादेव मंदिर
मुंबई उच्च न्यायालयाने आमच्या पक्षात निकाल दिल्याने आमच्या लढ्याला अधिक बळ मिळाले असून, भविष्यातदेखील दानाच्या रकमेचा पारदर्शक हिशेब मिळावा म्हणून लढा कायम चालू राहील.- देवेंद्र पाटील, मूळ तक्रारदार