नाशिक

नाशिक: जऊळके येथील ज्योती खैरणार यांना हायकोर्टाचा दिलासा, सरपंचपद पुन्हा मिळणार

अविनाश सुतार

येवला: पुढारी वृत्तसेवा : जऊळके (ता. येवला) येथील ज्योती खैरनार यांचे सरपंचपद आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांनी रद्द केले होते. याविरोधात खैरनार यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने वरील दोन्ही आदेश रद्द करत खैरनार यांना मोठा दिलासा दिला. त्यामुळे त्यांचे सरपंचपद पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

2019 च्या निवडणुकीत ज्योती प्रभाकर खैरनार या जनतेतून सरपंचपदी नियुक्त झाल्या होत्या. मात्र, सप्टेंबर 2021 मध्ये सदस्य चांगदेव खंडेराव जाधव, सदस्या मनीषा संतोष खैरनार यांचे पती संतोष कारभारी खैरनार यांनी नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे सरपंच ज्योती खैरनार यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार दाखल केली होती.

ज्योती खैरनार यांनी पतीच्या नावे वेगवेगळ्या चेक्सद्वारे एकूण १२ हजार ५८४ इतकी रक्कम काढून सरपंच पदाचा गैरवापर करीत आपल्या पतीला फायदा मिळवून दिला आहे, असा आरोप करत त्यांचे सरपंच पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली होती.
या अर्जावर जिल्हाधिकारी यांनी दि.19/10/2022 रोजी ज्योती खैरनार यांचे सदस्यत्व व सरपंच पद रद्द केले होते. त्यानंतर ज्योती खैरनार यांनी अप्पर आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले होते. अप्पर आयुक्त यांनी दि. 19/05/2023 रोजी सदर अपील फेटाळून लावत जिल्हाधिकारी यांचा निर्णय कायम केला होता.

या दोन्ही निर्णयांना ज्योती खैरनार यांनी मुंबई उच्च न्यायालयात अॅड. एकनाथ ढोकळे यांच्यातर्फे याचिका दाखल करुन आव्हान दिले होते. या याचिकेवर न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान अॅड. एकनाथ ढोकळे यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, जी काही रक्कम ज्योती खैरनार यांचे पतीला देण्यात आली होती. ती दि. 07/04/2020 रोजी ग्रामपंचायतीने पारित केलेल्या ठरावानुसारच देण्यात आली होती. सदर ठरावावर सदस्य म्हणून तक्रारदार यांनी त्यावेळी कोणताही आक्षेप घेतलेला नव्हता. शिवाय ज्योती खैरनार यांच्या पतीने लॉक डाऊन च्या काळात ग्रामपंचायतीत जी कामे होणे अत्यावश्यक होती. ती व्हावी म्हणून स्वतःच्या खिशातून जो खर्च केला होता, त्या बदल्यात त्यांना ती रक्कम देण्यात आली होती.

ही बाब सोडता ज्योती खैरनार किंवा त्यांचे पती यांचा ग्रामपंचायतीने केलेल्या कामामध्ये कोणताही भाग अथवा हितसंबंध नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकारी व अप्पर आयुक्त यांनी दिलेले आदेश हे केवळ अन्यायकारकच नाही. तर कायद्यासमोर टिकणारे देखील नाहीत, असा युक्तिवाद अॅड. ढोकळे यांनी केला. सदर युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने वरील दोन्ही आदेश रद्द केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ज्योती खैरनार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जऊळके गावच्या सरपंचपदी पुन्हा एकदा विराजमान होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT