नाशिक : मुंबई नाका येथील वाहतूक बेटावर उभारण्यात येत असलेल्या महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले दाम्पत्याच्या पुतळ्यांचा अनावरण सोहळा शनिवारी (दि. २८) रोजी होत असून या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी मुंबई नाका येथील मुख्य चौकाचे खडीकरण करून डांबरीकरण करणे तसेच मुख्य रस्त्यावरील दुरुस्तीच्या कामासाठी तीन कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे.
पुतळे कामासंदर्भात राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, मनपा शहर अभियंता संजय अग्रवाल आदी अधिकारी उपस्थित होते.
या उद्घाटनाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच मंत्री मंडळातील इतरही मंत्री उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सदर ठिकाणी काही महत्वाचे कामे करण्याविषयी मंत्री भुजबळ यांनी मनपा प्रशासनाला सूचना केल्या होत्या. चौकातील सर्कलचा घेर कमी केल्याने तेथील वाढीव जागेत उद्घाटनाच्या पहिले खडीकरण करून व संपूर्ण चौकाचे डांबरीकरण करून सुशोभिकरण करणे तसेच पुतळ्यांचे उद्घाटन झाल्यानंतर शेजारील महामार्ग बसस्थानक शेजारील मोकळ्या जागेत मान्यवरांचे स्वागत व इतर कार्यक्रम होणार असल्याने संबंधीत जागेची साफसफाई करून सपाटीकरण करण्याबाबत भुजबळ यांनी मनपाला निर्देश दिले असून, त्याअनुषंगाने आयुक्त करंजकर यांनी मुंबईनाका चौकात पाहणी करत काम तातडीने करण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे.