Nashik Household budget increase 
नाशिक

Nashik Household budget increase-१५ दिवसांतच महिन्याच्या बजेटमध्ये दीड हजारांची वाढ

महागाईच्या झळा : मध्यमवर्गीयांवर परिणाम, दैनंदिन वस्तूंचे दर कडाडले

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : फ्यूएल आणि पॉवर या दोन क्षेत्रांत महागाईचा विस्फोट झाल्यामुळे त्याचा परिणाम दैनंदिन वापरांच्या वस्तूंवर झाला आहे. अवघ्या १५ दिवसांतच महिन्याच्या किराण्यात तब्बल दीड हजाराची वाढ झाल्याने, गोरगरिबांसह मध्यमवर्गीय महागाईच्या तीव्र झळांमध्ये होरपळून निघत आहेत. साखरेपासून ते खाद्यतेलापर्यंत, दुधापासून ते गव्हाच्या पीठापर्यंत अशा सर्वच वस्तूंच्या दरात घसघशीत वाढ झाल्यामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

किचनमध्ये दैनंदिन लागणाऱ्या बहुतांश वस्तूंच्या दरात दि. १ मेपासून सातत्याने वाढ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे आवाहन केल्यापासून महागाईच्या झळा अधिकच तीव्र होत आहेत. एलपीजी आणि इंधन दरवाढ झाल्याने, त्याचा परिणाम सर्वच वस्तूंच्या किमती वाढण्यावर झाला आहे. खाडी देशांमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी आली आहे. हा तणाव निवळण्याऐवजी वाढतच असल्यामुहे पुढच्या काळात महागाईचा आणखी विस्फोट होण्याची भीती आहे. दरम्यान, दरवाढीमुळे महिन्याच्या घरखर्चात ५०० रुपयांपासून ते दीड हजारापर्यंतची वाढ झाली आहे. विशेषतः डाळी, तेल आणि साखरेच्या वाढलेल्या किमतींमुळे स्वयंपाकघराचे गणित बिघडले आहे. दुसरीकडे उष्णतेची लाट, पावसाचा अनियमितपणा आणि उत्पादन घट यामुळे डाळी व साखरेच्या पुरवठ्यावर दबाव निर्माण झाल्याने, पुढच्या काही दिवसांत महागाईचा आणखी महाविस्फोट होण्याची भीती वर्तविली जात आहे.

मसाले, पॅकिंग साहित्य महागले

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३.५० रुपयांची वाढ झाल्याने, मसाले आणि पॅकिंग साहित्यांमध्येदेखील ५ ते १० टक्क्यांची वाढ झाली आहे. याचाही परिणाम किचन बजेटवर होत आहे. काही कंपन्यांनी दर स्थिर ठेवताना, पॅकिंगमधील पदार्थांची संख्या कमी केली आहे. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रत्येकी तीन रुपयांची वाढ केल्याने, ट्रान्स्पोर्ट महाग झाले आहे. हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमतीत तब्बल ३० टक्क्यांची वाढ झाली आहे.

भाजपने आश्वासने देत विविध राज्यांमध्ये सत्ता मिळवली. आता युद्धाचे कारण देत महागाई वाढवली. यात केवळ सर्वसामान्य होरपळत आहेत. घर खर्च वाढला, बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी हतबल झाला आहे. अशा वेळी सरकारने जबाबदारी घेत पुढे यावे. केवळ आवाहने करून देशभक्तीच्या नावे लोकांचा भावनिक छळ करू नये.

- योगिता गायकवाड

देशात महागाईने उच्चांक गाठला असून, त्याची सर्वाधिक झळ सर्वसामान्यांना बसत असून, किचनचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. सरकारकडून खाद्य तेल कमी खाण्याचे आवाहन केले जात आहे. त्याऐवजी त्यांनी उपाययोजनांवर बोलल्यास, नागरिकांना किमान दिलासा मिळेल. सद्यःस्थिती पाहता पुढचा काळ हा आव्हानात्मक असेल.

- सविता बोधले, गृहिणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT