गतवर्षीच्या तुलनेत यंदा मंडपातील ध्वनिक्षेपकावर मर्यादा ठेवण्यात बऱ्यापैकी यश ल्या गणेशभक्तांना विसर्जन मिरवणुकीत मात्र दणदणाटातच बाप्पाला निरोप देण्याचा मोह आवरता आला नाही. परिणामी यंदाही ९४ डेसिबलहून अधिक आवाजाची क्षमता नोंदविली गेल्याने, ध्वनी प्रदूषण अधिनियमांना तिलांजली दिल्याचे दिसून आले. नाशिकमध्ये सर्वाधिक ध्वनी प्रदूषण नाशिक रोड भागात नोंदविले गेले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) संपूर्ण गणेशोत्सव काळात शहरातील सहाही विभागांत ध्वनिक्षेपाची क्षमता मोजली. यात आगमनाचा दिवस वगळता इतर दिवशी ध्वनिक्षेपावर मर्यादा ठेवण्यात मंडळांना काही प्रमाणात यश आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने सायंकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत शहरातील नाशिक रोड / रामकुंड, पंचवटी / अशोक स्तंभ, जिल्हा शासकीय रुग्णालय / गाडगे महाराज पुतळा, त्रिमूर्ती चौक, सातपूर बस स्टॅण्ड / सिडको या भागांत आवाजाची पातळी मोजली. आगमनाच्या दिवशी नाशिक रोड / रामकुंड परिसरात सर्वाधिक ८३ डेसिबलची नोंद झाली. पाठोपाठ त्रिमूर्ती चौक, पंचवटी या भागांत ७८ डेसिबलची नोंद झाली. त्यानंतर सातपूर ७६ डेसिबल आणि जिल्हा शासकीय रुग्णालय ७२ डेसिबल इतकी नोंद झाली. त्यानंतरचे 10 दिवस पंचवटी / अशोक स्तंभ या भागात सायंकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत सर्वाधिक ध्वनी प्रदूषणाची नोंद झाली.
वास्तविक, न्यायालयाने यंदा डीजेला बंदी घातली होती. मात्र, अशातही विसर्जन मिरवणुकीत तब्बल १४ गणेश मंडळांनी डीजेचा वापर केला. त्यातील सात मंडळांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मानवी जीवनात ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम ७० डेसिबलनंतर सुरू होतात. त्यानंतरचा आवाज कानावर पडला, तर सर्वसामान्यांच्या आरोग्यावर धोकादायक परिणाम होतात. बहिरेपणा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह अशा नानाविध आजारांचा सामना नागरिकांना करावा लागतो.
गणेशोत्सव काळात ध्वनी प्रदूषणाची भीती अधिक असते. त्यामुळे या काळात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. यंदाचेही आकडे चिंताजनक असले, तरी आगमन आणि विसर्जन वगळता काही मंडळांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. इतरांनीही याचे अनुकरण केल्यास, बाप्पाचा हा उत्सव खऱ्या अर्थाने 'विघ्न' दूर करणारा ठरेल.एल. एस. भड, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नाशिक.