नाशिक : अंमली पदार्थ वाहतूक प्रकरणात तुमचा सहभाग असल्याची भिती घालून भामट्यांनी एका महिलेस सुमारे साडेतीन लाख रुपयांचा गंडा घातला. नोकरदार असलेल्या महिलेच्या फिर्यादीनुसार, ऑनलाइन अटक केल्याचे सांगत कुटूंबियांच्या जीवाला धोका असल्याचे धमकावत भामट्यांनी २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान हा गंडा घातला.
भामट्यांनी महिलेस व्हॉट्सअपवरून संपर्क साधून कुरीअर कंपनीतून तसेच मुंबई सायबर पोलिस बोलत असल्याचे भासवले. तुमच्या नावे आलेल्या पार्सलमध्ये २०० ग्रॅम अंमली पदार्थ, पाच पासपोर्ट, तीन एटीएम कार्ड व इतर वस्तु आढळून आल्याचे भामट्यांनी महिलेस सांगितले. तसेच तुमची चौकशी केली जात असून तुमच्या बँक खात्यातून मनी लॉड्रींगचे व्यवहारही केल्याची भिती घातली. त्यामुळे अटक वॉरंट काढल्याचे महिलेस सांगितले. व्हॉट्सअपवरच महिलेला नोटीस पाठवून तुमच्यावर पोलिसांचे लक्ष असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे मनी लॉड्रींग करणाऱ्यापासून तुमच्या व कुटूंबियांच्या जीवाला धोका असल्याची भितीही महिलेस घातली. त्यानंतर महिलेस दर तासाला मेसेज करण्यास भाग पाडून महिलेस व्हर्च्युअल अटक केल्याचे भासवले. कारवाईबाबत गुप्तता बाळगण्याचा इशारा भामट्यांनी दिल्याने महिलेने ही बाब कोणालाही सांगितली नाही. तसेच भामट्यांनी ऑनलाइन पद्धतीने महिलेकडून तीन लाख ३६ हजार ७९३ रुपये खंडणी स्वरुपात घेतले.
अखेर फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात महिलेशी संपर्क साधणाऱ्यांसह व्हॉट्सअपधारक, ज्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले, त्या खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.