नाशिक : जुलैअखेर झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. जिल्ह्यात २०४ घरांचे नुकसान झाले असून, एका व्यक्तीचा मृत्यू, दोन जखमी, पशुधनाची हानी तसेच गोठे, झोपड्या व शेतीचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाच्या अहवालातून समोर आली आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने उशिरा हजेरी लावली असली, तरी त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली. नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. अनेक भागांतील घरे, शेती आणि जनजीवन विस्कळीत झाले असून, जिल्ह्यात एकूण २०४ घरांची पडझड झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
पुराच्या तडाख्यात इगतपुरी तालुक्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्र्यंबकेश्वर आणि सिन्नर तालुक्यात प्रत्येकी एक व्यक्ती जखमी झाली आहे. जिल्ह्यात पशुधनाचेही मोठे नुकसान झाले असून, एकूण २५ जनावरे दगावली आहेत. त्यामध्ये बागलाण तालुक्यात सर्वाधिक पाच जनावरांचा समावेश आहे.
मुसळधार पावसामुळे गोठे, पोल्ट्री आणि झोपड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २६ गोठे व झोपड्या बाधित झाल्या असून नाशिक तालुक्यात सर्वाधिक १२ गोठे व पोल्ट्रींचे नुकसान झाले आहे. तसेच एका विहिरीचेही नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे.
प्रशासनाच्या अहवालानुसार इगतपुरी, कळवण, सुरगाणा, नाशिक आणि बागलाण तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन, शेतीची हानी आणि वाहतुकीवर परिणाम झाल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. नुकसानग्रस्तांना मदत व पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.
जिल्ह्यात झालेले नुकसान घरांची पडझड :
२०४ मृत्यू: १ जखमी : २ पशुधनाची हानी : २५ जनावरे नुकसान : २६ विहिरीचे नुकसान : १ गोठे, पोल्ट्री व झोपड्यांचे
सर्वाधिक फटका बसलेले तालुके
कळवण (३२ घरे) इगतपुरी (२८) सुरगाणा (२६) त्र्यंबकेश्वर (२५) नाशिक व बागलाण (प्रत्येकी १६) पेठ (१५) निफाड (११).