नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पेठ, हरसूल, सुरगाणा आणि त्र्यंबकेश्वरमध्ये गत काही दिवसांमध्ये भुकंपाचे धक्के बसत असल्याने याबाबतचा अभ्यास करण्यासाठी नागपूर येथील जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे भुगर्भशास्त्रज्ञ हर्षराज वानखेडे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
गत महिन्यात 24 डिसेंबर आणि 2 जानेवारीला पेठ, हरसुलमध्ये दोन वेळा भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. पेठ, हरसूल, सुरगाणामधील अनेक गावांना रात्री जमिनीतून मोठा आवाज होऊन भूकंपसदृश्य धक्का जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती. त्यानंतर पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने नागरिक भयभीत झाले होते. पेठ तालुक्यातील मानकापूर, आडगाव भुवन धानपाडा आदी गावांसह हरसूल आणि त्र्यंबकमधील गावांमध्येही हा धक्का जाणवला होता. मेरी येथील भुकंपमापकावर त्याची नोंदही झाली होती. धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिकची रचना भौगोलिकरित्या वेगळी असल्याने येथे भुकंपाचे सौम्य धक्के कायम जाणवतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, त्यातून मोठा धोका होण्याची शक्यता कितपत आहे. ते टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, वारंवार बसणार्या धक्यांची पातळी किती धोकादायक आहे याबाबत वानखेडे अभ्यास करणार आहेत. दि. 21 जानेवारीपर्यंत ते या गावांमध्ये दौरा करून त्याचा अहवाल शासनाला सादर करणार आहेत. त्यानंतर आवश्यक ते निर्णय घेतले जातील, अशी माहिती जिल्हा प्रशासनतर्फे देण्यात आली आहे.