Water Scarcity Pudhari
नाशिक

Nashik Water Scarcity | उन्हाचा पारा चढला, जलस्रोत आटले! नाशिकमधील दीड लाख लोकसंख्येची तहान आता टँकरवर

Nashik Water Scarcity | दीड लाख लोकसंख्येसाठी 28 विहिरींचे अधिग्रहण

पुढारी वृत्तसेवा

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

उन्हाचा तडाखा वाढत असताना नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील ८१ गावे व २०३ वाड्यांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून ९० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. दररोज १८१ फेऱ्यांद्वारे एक लाख ५२ हजार ८४५ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात असून, त्यासाठी २८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

यंदा उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे गावखेड्यातील पाण्याचे स्रोत आटत आहेत. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच आदिवासी तालुक्यांसह मालेगाव, देवळा, इगतपुरी, येवला आणि सिन्नर तालुक्यांतील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली होती. सर्वप्रथम येवला, इगतपुरी, मालेगाव, देवळा, सिन्नर आणि पेठ तालुक्यांतून टँकरची मागणी करण्यात आली.

विशेष म्हणजे, मागील वर्षी चांगला पाऊस होऊनही येवला तालुक्यात यंदाही लवकर टँकरची गरज भासू लागली आहे. दुसरीकडे नांदगाव, बागलाण, दिंडोरी, नाशिक, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण आणि निफाड तालुक्यांमध्ये अद्याप टँकरची मागणी झालेली नाही. जिल्ह्यातील धरणांमध्ये मार्च अखेरपर्यंत ४८.९४ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने धरणांची स्थिती समाधानकारक आहे. मात्र ग्रामीण भागातील विहिरी व स्थानिक पाणीस्रोत कोरडे पडल्यामुळे टँकरची आवश्यकता निर्माण झाली आहे.

विशेषतः आदिवासी भागांतून सुरुवातीला मागणी वाढली होती. मालेगाव, येवला आणि इगतपुरी तालुक्यांतील वाड्या-पाड्यांवर पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने या तीन तालुक्यांत सध्या सर्वाधिक टँकर सुरू आहेत. आगामी दिवसांत टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. तहसील स्तरावरून प्राप्त प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविले जात असून, मंजुरीनंतर स्थानिक पातळीवर टँकर सुरू करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे.

एप्रिल महिन्यात प्राप्त झालेल्या अनेक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, आणखी काही प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्ह्यात सध्या ९० खासगी टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी येवला तालुक्यात सर्वाधिक ३३, मालेगाव व इगतपुरी प्रत्येकी १४, चांदवड ८, पेठ ५, सिन्नर ९, सुरगाणा ४ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या टँकरद्वारे दररोज १८१ फेऱ्या केल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT