देवळा : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे पूर्व भागातील निंबोळा, महालपाटणे, मेशी, डोंगरगाव, रणादेवपाडे, देवपूरपाडे, खालप, वासोळ आदी तर पश्चिम भागातील खर्डे परिसरात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. काढणीला आलेला व नुकताच वावरात काढून ठेवलेला शेतमाल पाण्यामध्ये भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
यंदा सुरुवातीपासूनच पावसाळा चांगला असल्याने या भागात मका, कांदा, तूर ही पीके मोठ्या प्रमाणात घेतली गेली. सध्या मका कापणीची लगबग सुरू होती. परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मकाचारा व बिट्टी भिजून गेली आहे. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून नेल्याने शेतकरी वर्ग हताश झाला आहे. बाजारातही बियाण्याचा तुटवडा असल्याने कांदा बियाण्याअभावी हंगाम वाया जाण्याची भीती आहे. याची दखल घेऊन शासनाने तात्काळ सरसकट आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील मका, कांदा रोप, तुर, मिरची अशा अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मी स्वतः २० किलो कांद्याचे रोप विकत घेऊन महिनाभरापूर्वी जमिनीत पेरले होते. परंतु पावसामुळे ते पूर्णपणे खराब झाले.अभिमन आहिरे, प्रगतिशील शेतकरी, देवपूरपाडे (ता. देवळा)