नाशिक : अघोरी पूजा आणि महिलांच्या कथित लैंगिक शोषणामुळे राज्यभर गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा ओघ वाढत असून, विशेष तपास पथकाने सुरू केलेल्या हेल्पलाइनवर अवघ्या काही दिवसांत १०० हून अधिक फोन कॉल्स प्राप्त झाले आहेत. या कॉल्समधून अनेक धक्कादायक बाबी समोर येत असल्यामुळे तपासाची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एसआयटीकडून नागरिकांना माहिती देण्यासाठी दोन स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आले होते. त्यावर नाशिक, पुणे तसेच अहिल्यानगर (अहमदनगर) या भागांमधून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः अनेक महिलांनी पुढे येत अशोक खरातकडून झालेल्या अत्याचार, फसवणूक आणि मानसिक छळाबाबत पोलिसांना माहिती दिली आहे.
तपासाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात केवळ महिलांचे शोषणच नव्हे, तर काही राजकीय व्यक्ती आणि उच्चभ्रू वर्तुळातील व्यक्तींनाही कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याची शक्यता तपासात पुढे येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा विस्तार केवळ नाशिकपुरता मर्यादित न राहता, राज्यभर पसरल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, एसआयटीकडून मिळालेल्या प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी केली जात असून संबंधित पुरावे, कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल माहिती यांचे विश्लेषण करण्यात येत आहे. पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहनही पीडितांना करण्यात आले आहे. या प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असल्यामुळे राज्यभर खळबळ उडाली असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.