नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून टोळक्याने अजय शंकर भंडारी (२५, रा. विष्णूनगर, स्टेशनवाडी, सिन्नर फाटा) याचा धारदार शस्त्र व दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. २०) दुपारी उघडकीस आली होती. नवले कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून पुढे काही मीटर अंतरावर आयएसपी प्रेसच्या भूखंडावर अजयचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर नाशिक रोड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित अवघ्या तासाभरात तीन विधिसंघर्षित बालकांसह संशयिताला ताब्यात घेतले आहे.
नाशिक रोड पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता, अजयच्या अंगावर गंभीर जखमा आढळल्या होत्या. तसेच अंगावरील कपड्यांवर रक्ताचे डाग होते. या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार व गुन्हे शोध पथकाचे पोलिस अंमलदार यांनी माहिती घेतली असता, बुधवारी (दि. १९) मध्यरात्री अजयला मागील भांडणाची कुरापत काढून त्याच्या डोक्यात दगड टाकून व धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे निष्पन्न झाले होते.
पोलिसांनी आरोपीच्या शोधार्थ कॉलनीत ठिकठिकाणी लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात काही संशयास्पद इसम दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी सूत्रांमार्फत संशयितांची माहिती घेतली असता, देवी चौक व आशानगर परिसरात संशयित राहात असल्याचे कळाले. त्यानुसार पोलिस संशयितांचा शोध घेत असता, नाशिक रोड रेल्वेस्थानक परिसरात चारही संशयित पोलिसांना मिळून आले.
त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, वर्षभरापूर्वी अजय भंडारीने विधिसंघर्षित बालकाच्या भावाला मारहाण केली होती. त्यामुळे तिन्ही विधिसंघर्षित व संशयित तुषार संजय खरे (१८, रा. देवी चौक, नाशिक रोड) यांनी अजय भंडारी याची निर्घृण हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
अजयचा मोठा भाऊ अक्षय भंडारीने रात्री त्याला मोबाइलवर फोन करून, गाडीचे पेट्रोल संपले आहे. पेट्रोल घेऊन ये असे सांगितले होते. त्यानंतर काही वेळाने अजय पेट्रोल घेऊन आला. मात्र, शिवजयंतीच्या गर्दीमुळे अजयने गाडी दुसरीकडे पार्क केल्याने त्यांना दुचाकीत पेट्रोल टाकणे शक्य झाले नाही. अक्षयने भाऊ अजयला, 'तू चल घरी, गाडी येथेच राहू दे' असे सांगितले. मात्र, अजयने अक्षयसमवेत येण्यास नकार दिला. जर अजय भावासमवेत घरी गेला असता, तर त्याचे प्राण वाचले असते, अशीही चर्चा यानिमित्त होत आहे.