पुढारी ऑनलाइन डेस्क | आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. कॉंग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या दोन दिवसांत त्या कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी डॉ. हेमतलता पाटील मध्य विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकीटावर लढण्यास इच्छुक होत्या. मात्र महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत मध्य ची जागा ठाकरे गटाला गेली. त्यामुळे या मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी ठाकरे गटाचे वसंत गिते यांना मिळाली. ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्याने तेव्हापासूनच पाटील या नाराज होत्या.
पाटील यांनी बंडखोरी करत गिते यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र महाविकास आघाडी धर्माचे पालन करण्यासाठी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत गिते यांना पाठिंबा दर्शवला. प्रचारातही त्यांनी सहभागी होत आघाडीचे काम केले.
मात्र, दरम्यान पक्षात आपला वारंवार अपमान होत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली होती. त्या नाराजीचा अखेर विस्फोट होऊन पाटील यांनी कॉंग्रेसपक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांत त्या राजीनामा देणार असल्याची माहिती कळते आहे. दरम्यान कॉंग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्या कोणत्या पक्षात जाता हे पाहावे लागणार आहे. भाजप, शिंदे सेना की राष्ट्रवादी अजित पवार गट हे निश्चित नसले तरी लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या नंतर नाशिकमध्ये कॉंग्रेस पक्षाला गळती लागल्याचे चिन्हे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच कॉंग्रसेचे माजी नगरसेवक समीर(जॉय) कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हाती घेतला. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धोक्याची घंटा समजली जात आहे.
हेमलता पाटील यांनी केलेली फेसबुकपोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. जेव्हा तुमची निष्ठा तुमचा प्रामाणिक पणा ही तुमची कमजोरी समजली जाते .तुम्ही ज्याला आपुलकीचा बंध समजता त्याच बंधा चा वापर तुमच्या भोवती आवळण्याचा फास म्हणून होतो तेंव्हा हा बंध झुगारणे हाच एकमेव मार्ग आहे. अशा विचारा प्रती मी आता पोहचलेय.तुम्ही माझ्या विचारांशी सहमत आहात का? अपेक्षा आहे भावी राजकिय वाटचाली साठी आपल्या अशिर्वादा ची, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.