नाशिक : आदिवासींचे आरोग्य विषयक प्रश्नांवर उहापोह आणि उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय परिषदेला शुक्रवारी (दि. 31) पासून प्रारंभ होत आहे. नागपूर येथील आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सभागृहात 2 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या 'एमयूएचएस फर्स्ट-25 परिषदेला विविध विषयाचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यसभेचे माजी सदस्य पद्मश्री डॉ. विकास मेहता व वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली 'ट्रायबल डेव्हलपमेंट थ्रु एज्युकेशन, रिसर्च ॲण्ड अवेरनेस' विषयावर विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर या मार्गदर्शन करणार आहेत. 'ट्रायबल हेल्थ इन महाराष्ट्र प्रॅक्टिस, पॉलिटिक्स अँड प्रोस्पेक्ट्स' या विषयावर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक मार्गदर्शन करणार आहेत.
प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, आदिवासी समुदायातील लोकांच्या आरोग्य सुविधांना चालना देणे गरजेचे आहे. त्यासाठी त्या आजारांचे ज्ञान व संशोधनासाठी पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. आदीवासींच्या आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित करून योग्य दिशेने कृतीशील मार्ग तयार करण्याचा या परिसंवादाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.