नगरसूल (नाशिक): येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील नगरसूल आणि परिसरातील अनेक गावांमध्ये भारत दूरसंचार निगमची (बीएसएनएल) सेवा शनिवार (दि. 19) पासून पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे बँका, पोस्ट ऑफिस, मोबाइलसेवा, आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत. परिणामी, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्य केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही सेवा खंडित झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बीएसएनएल मोबाइलसेवा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे ग्राहकांचे संपर्क तुटले आहेत. नगरसूल येथील पोस्ट ऑफिस आणि जिल्हा बँकेचे कामकाजही नेटवर्कअभावी शनिवारपासून बंद आहे, त्यामुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. पोस्ट ऑफिस आणि बँकेतील व्यवहारांसाठी नागरिकांना शेजारच्या गावांत जावे लागत असून, त्यामुळे या ठिकाणी मोठी गर्दी दिसून येत आहे. तसेच, ग्रामीण रुग्णालयातील टेलिफोनसेवाही सहा दिवसांपासून बंद असल्यामुळे रुग्णसेवांवरही परिणाम झाला आहे. विकास सोसायटी आणि जिल्हा बँकेमार्फत दिले जाणारे पीककर्ज वाटपही खोळंबल्याची तक्रार शेतकरी संजय वैद्य, राजेंद्र धनवटे, गोरख बटवल, लक्ष्मण चव्हाण, दिलीप गिडगे, कारभारी कमोदकर, सुभाष बटवल, बाळनाथ साबळे, अनिल आहेर, रामनाथ कमोदकर, नवनाथ जाधव आणि अंबादास राऊत यांनी केली आहे.
येवल्याजवळ नांदगाव रोड परिसरात घर बांधकाम पाया खोदताना दूरसंचार सेवा वाहिनी केबल तुटली आहे. तेथील घरमालक सहकार्य करत नसल्याने व गावी निघून गेल्यामुळे केबल जोडणीस विलंब होत आहे.एस. एन. मेंदणे, विभागीय अभियंता, दूरसंचार निगम, नाशिक.
सहा दिवसांपासून बीएसएनएलची नेटवर्क सेवा बंद पडल्यामुळे पोस्ट ऑफिस व जिल्हा बँक शाखेतील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्वरित कारवाई करावी.डी. जी. भरते, शाखा व्यवस्थापक, जिल्हा बँक, नगरसूल, नाशिक.