नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा देत नाशिक जिल्हा प्रशासनाने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. यंदा १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील ३९ अनुकंपाधारकांना थेट नियुक्ती आदेश सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया गतीने आणि पारदर्शकपणे राबवून एकाच वेळी नियुक्ती आदेश देणारा नाशिक हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या संपूर्ण प्रक्रियेला गति देण्यासाठी आणि ती अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी 'तृतीय श्रेणी' (गट-क) संवर्गातील पदांसाठी पात्र उमेदवारांची विशेष समुपदेशन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार उपलब्ध रिक्त पदांचे पर्याय देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्याल्याने घेतलेल्या या तातडीच्या निर्णयामुळे अनुकंपा यादीत दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या कुटुंबांना मोठा आर्थिक आणि सामाजिक आधार मिळणार आहे. तृतीय श्रेणीतील रिक्त पदे भरताना प्रशासकीय पारदर्शकता राखली गेल्याने उमेदवारांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.
जिल्हा प्रशासनाने या समुपदेशन बैठकीसाठी ४० पात्र उमेदवारांना पाचारण केले होते. मात्र, या महत्त्वपूर्ण प्रक्रियेदरम्यान एक उमेदवार गैरहजर राहिला. जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली असून, शासकीय प्रक्रियेत दिरंगाई खपवून न घेण्याच्या भूमिकेतून संबंधित उमेदवाराला नोकरीची गरज नाही का, याबाबत गैरहजर उमेदवाराला तातडीने नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
"जिल्ह्यातील अनुकंपाधारकांच्या सर्व ४० प्रलंबित प्रकरणांवर निर्णय घेण्यात आला. आता जिल्ह्यातील एकही प्रकरण प्रलंबित नाही. केवळ एक उमेदवार आज उपस्थित नव्हता. त्यामुळे संबंधित उमेदवाराला नोकरीची गरज नाही, असे दिसून येते. त्यास नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत."- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी