नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आक्षेपार्ह व्हिडिओंमुळे पीडित महिलांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाशिक शहरात उघडकीस आलेल्या भोंद्वाबा खरात प्रकरणामुळे सध्या सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील काही आक्षेपार्ह व्हिडिओ गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून, यामुळे सुमारे ८ ते ९ पीडित महिलांना तीव्र मानसिक धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. या महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेत उपचार सुरू केल्याचेही समजते.
झालेल्या व्हायरल व्हिडिओंमध्ये संबंधित महिलांचे चेहरे स्पष्ट दिसत असल्याने त्यांची ओळख उघड होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या महिलांमध्ये प्रचंड मानसिक तणाव, भीती व नैराश्याची भावना वाढली असून, समाजात वावरणेही कठीण झाले आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाचा सुरू असलेला असंवेदनशील प्रसार पीडितांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
तपासादरम्यान आणखी धक्कादायक बाबी समोर येत असून, खरात याने अनेक महिलांची बँक खाती उघडून स्वतःला नॉमिनी ठेवले होते. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आर्थिक फसवणुकीचा पैलूही या प्रकरणात अधिक गडद होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये महिलांची चेहरे स्पष्ट दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओच्या जवळपास ३५०० लिंक पोलिस यंत्रणेने समाजमाध्यमांवरून हटवले आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी हे विरोध दिसून येत आहे. नागरिकांनीही त्या व्हिडिओंबद्दल चर्चा करताना विशिष्ट काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कारण ती महिला कुणाची तरी आई, पत्नी, मुलगी आहे. हे प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे.
विशेष तपास पथकाने या प्रकरणात धडक कारवाई करत कर्मयोगी नगर परिसरातील 'तृप्तबाला' बंगल्यावर छापा टाकून तपासाची गती वाढवली आहे. पीडित महिलांची ओळख गुप्त ठेवण्यासाठी त्यांची चौकशी अज्ञातस्थळी करण्यात येत असून, त्यांना पूर्ण सुरक्षा देण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सायबर पोलिसांकडून व्हायरल व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवरही लक्ष ठेवण्यात येत असून, अशा व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी समाजाने सजग राहणे आणि पीडितांना आधार देणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.