नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उन्हाच्या तीव्रतेमुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटल्याने आणि बाजारातील आवक निम्म्यावर आल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत फळभाज्या व पालेभाज्यांच्या दरात मोठी उसळी दिसून येत आहे. रविवारी (दि. ७) झालेल्या लिलावात दोडक्याला तब्बल ७ हजार ७५ रुपये प्रतिक्विंटलचा उच्चांकी भाव मिळाला, तर पालेभाज्यांमध्ये कांदापात ६ हजार ६५९ रुपये शेकडा दराने विकली गेली.
त्यामुळे भाजीपाल्याचे दर सध्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचे चित्र आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भाजीपाल्याचे दर सातत्याने वाढत असून, त्यात घट होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आकडेवारीनुसार फळभाज्यांना प्रतिकिलो ८० रुपयांहून अधिक दर मिळत आहेत.
रविवारी झालेल्या लिलावात दोडक्यानंतर वांग्याला ६ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. गिलके ४ हजार १६५ रुपये, कारले ५ हजार ८३५ रुपये, तर ढोबळी मिरचीने ८ हजार १२५ रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठला. पालेभाज्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. कांदापात, मेथी, कोथिंबीर आणि शेपू यांना उच्चांकी भाव मिळाले.
मेथीला ६ हजार ८०० रुपये, तर कोथिंबिरीला ५ हजार रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे बाजार समितीच्या नोंदीतून स्पष्ट होते. किरकोळ बाजारात कोथिंबिरीची जुडी ७० ते ८० रुपये, तर मेथी ६० ते ७० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात पावसाळ्याचा हंगाम सुरू झाला असला तरी समाधानकारक पाऊस अद्याप झालेला नाही.
विहिरी, शेततळी आणि अन्य जलस्रोतांतील पाणीपातळी घटल्याने भाजीपाला पिकांना आवश्यक पाणीपुरवठा होत नाही. परिणामी उत्पादनात घट झाली असून बाजारात केवळ ४५ ते ५० टक्केच आवक होत आहे. याशिवाय सुट्या आणि लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे.