नाशिक : अतिवृष्टीमुळे काठोकाठ भरलेल्या धरण परिसरात अवकाळी पाऊस जोरदार पडत असल्याने जिल्ह्यातील नऊ धरणांतून सातत्याने विसर्ग वाढवण्यात येत आहे. गुरुवारी (दि.३०) सकाळी नऊपर्यंत तीन हजार १५५ क्यूसेक विसर्ग दुपारी १२ पासून ८०७ क्यूसेकने वाढवून ३ हजार ९६२ इतका करण्यात आला. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या २५ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. दिंडोरी, येवला, मनमाड, मालेगाव, चांदवड, इगतपुरी, नांदगाव या तालुक्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. हवामान विभागाने २ नोव्हेंबरपर्यंत नाशिकला यलो अलर्ट दिल्याने अवकाळी आणखी कोसळण्याची शक्यता आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे काठोकाठ भरलेल्या धरणांत अवकाळी पावसाची भर पडत असल्याने प्रशासनाकडून धरणांमधून विसर्ग केला जात आहे.
गेल्या मंगळवारी (दि. २१) ४७६९ क्यूसेकचा विसर्ग बुधवारी (दि.२९) ६३१० पर्यंत वाढवण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी त्यात घट करून ३१५५ इतका केला. मात्र, दुपारी पुन्हा त्यात वाढ करून ३९६२ क्यूसेकनी विसर्ग वाढवण्यात आला. गुरुवारी जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरात दिवसभर सरीवर सरी सुरू होत्या. त्यामुळे विसर्गात आणखी वाढ केली जाण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
या धरणांमधून विसर्ग
दारणा - २५०
पालखेड - ८७६
करंजवन - १५०
ओझरखेड - ५३०
वाघाड - ५४
तिसगाव - ४३
पुणेगाव - ५००
होळकर बंधारा - ९८
गौतमी गोदावरी - १४४
एकूण - नांदूर मध्यमेश्वर - ३९६२
2 नोव्हेंबरपर्यंत 'यलो अलर्ट'
बंगाल उपसागरातील मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा या एकत्रित परिणामामुळे ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहून हलका ते मुसळधार पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. नाशिकमध्ये २ नोव्हेंबरपर्यंत यलो अलर्ट दिल्याने अवकाळी आणखी हजेरी लावण्याची शक्यता आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने जिल्ह्यात शेतपिकाचे अतोनात नुकसान केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
जायकवाडीला पाणीच पाणी
पैठण येथील जायकवाडी धरणात यंदा नाशिकमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो क्युसेक पाणी जायकवाडीकडे पाठवण्यात आले. परिणामी राज्यातील सर्वात मोठे धरण असलेले जायकवाडीही यंदा काठोकाठ भरले आहे. त्यामुळे पावसाळ्यात जायकवाडीमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मराठवाड्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. आता नाशिकमधून जायकवाडीला सातत्याने पाणी सोडले जात असल्याने जायकवाडीतूनही विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे.