नाशिक

Nashik Accident : बेशिस्त वाहनधारक पादचाऱ्यांच्या मुळावर, 11 महिन्यात ४५ जणांचा अपघाती मृत्यू

गणेश सोनवणे

शहरात जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत अपघातांमध्ये १७१ नागरिकांचा मृत्यू झाला असून ४२२ नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सर्वाधिक १०६ दुचाकीस्वारांचा समावेश असून त्याखालोखाल ४५ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरातील रस्त्यांवरून पायी चालणेही धोकादायक असल्याचे चित्र आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सर्वाधिक अपघात होत असतात. वेगाने वाहने चालवणे, वाहतूक नियम न पाळणे यामुळे अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे तसेच अनेक जण जखमी झाले असून काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. चालू वर्षात शहरात ४२६ अपघात झाले असून त्यात १७१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २१ महिला व १५० पुरुषांचा समावेश आहे. तसेच ३२२ गंभीर जखमी झाले तर १०० जण किरकोळ स्वरुपात जखमी झाले आहेत. सर्वाधिक ८६ अपघात शहरातील कॉलनी रोड, इतर रस्त्यांवर झाले असून तर राष्ट्रीय महामार्गांवर ७१ आणि राज्य महामार्गावर ५ अपघात झाल्याची नोंद आहे. दरम्यान, वेगवान दुचाकी चालवण्यासोबतच सुरक्षीततेसाठी असलेले हेल्मेट न घातल्याने १०६ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. तर रस्ता ओलांडताना, कडेला उभ्या असलेल्या किंवा पायी चालणाऱ्यांना वाहनांनी धडक दिल्याने ४५ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील रस्ते पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे.

अपघाती मृत्यू असे

स्वरुपमृत्यूजखमी
दुचाकीस्वार106269
पादचारी4593
सायकलस्वार63
हलकी वाहने634
रिक्षा चालक-प्रवासी517
ट्रकचालक-क्लिनर26
ट्रॅक्टर प्रवासी10

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT