नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य केवळ पर्यटन स्थळ नाही, तर ते भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक संपत्ती आहे. त्यामुळे आगामी १० वर्षांत जैवविविधतेच्या रक्षणाबरोबरच पर्यावरणपूरक पर्यटनाचा समतोल साधणे हेच पुढील दशकाचे ध्येय असले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य स्थापनेला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी प्रसाद बोलत होते. यावेळी खा. भास्कर भगरे, आ. दिलीप बनकर, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, विभागीय व्यवस्थापक उमेश वावरे, विभागीय वनअधिकारी गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक हेमंत उबाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, पक्षी अभयारण्य परिसरात ध्वनी मर्यादा काटेकोर लागू केल्या जातील. मोठ्या आवाजातील संगीत, वाहनांचे अनावश्यक हॉर्न व इतर ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवून शांत पर्यावरण निश्चित करण्यात येईल. पक्षी अभयारण्य परिसरात अनधिकृत उत्खननांवर कठोर निर्बंध घालण्यात येणार असून, जलाशय आणि किनारी परिसंस्थेच्या रक्षणासाठी सतत निरीक्षण यंत्रणा कार्यरत ठेवली जाईल.
पर्यटकांसाठी वैज्ञानिक पद्धतीने नियोजित विशेष दर्शन-बिंदू उभारले जाईल. यामुळे पक्ष्यांचे निरीक्षण सुलभ होईल. मात्र, पक्ष्यांच्या अधिवासाला कोणताही त्रास होणार नाही. पक्षी अभयारण्यात आधुनिक इंटरप्रिटेशन सेंटर उभारण्याचा प्रस्ताव आहे.
अभयारण्याची ओळख अधिक व्यापक करण्यासाठी सर्व प्रमुख राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर, विमानतळ आणि रेल्वेस्थानकांत माहितीफलक व दिशादर्शक फलक उभारण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नांदूरमध्यमेश्वर ४० या स्मरणिकेचे व माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले तसेच पर्यटकांकरिता वार्षिक पास, पीटी झेड कॅमेरा रूम, ४० हजार विद्यार्थ्यांकरिता मोफत प्रवेश अशा विविध योजनांचे उद्घाटनदेखील करण्यात आले. खा. भगरे यांनी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याचा विकास करून जागतिक स्तरावरचे निसर्गपर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या सूचना केल्या.
आ. बनकर यांनी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याच्या विकासाकरिता नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे सांगितले. उपवनसंरक्षक भवर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण तसेच दत्ताकाका उगावकर, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक आणि भरत शिंदे, विभागीय वनअधिकारी यांनी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले, तर वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी आभार मानले.
कृत्रिम प्रकाशामुळे रात्रीच्या वेळेस स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांच्या नैसर्गिक जीवनचक्रावर परिणाम होतो. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरात पक्ष्यांना सुरक्षित अधिवास उपलब्ध करून देण्यासाठी लाइट फ्री डार्क झोन संकल्पना राबविण्यात येईल.- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक