चांदवड : सुनील थोरे
दैनिक 'पुढारी'ने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक खड्ड्यांचा प्रश्न प्रभावीपणे मांडल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि मंगरूळ टोल प्रशासन खडबडून जागे झाले असून, राहुड परिसरातील महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त करत दैनिक 'पुढारी'चे आभार मानले आहेत.
चांदवड तालुक्यातील राहुड गावाच्या शिवारातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांचा जीव धोक्यात आला होता. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी या रस्त्याचे नूतनीकरण झाले असतानाही महामार्गाची दुरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. एकीकडे टोलवसुली सुरू असताना दुसरीकडे रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
या गंभीर समस्येवर दैनिक 'पुढारी'ने २८ जुलैच्या अंकात 'मुंबई-आग्रा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व मंगरूळ टोल प्रशासनाने तत्काळ हालचाली करत रेणुका माता मंदिर ते राहुड दरम्यानच्या महामार्गावरील खड्डे सिमेंट काँक्रीटच्या गट्ट्यांच्या साहाय्याने बुजविण्याचे काम सुरू केले.
खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होणार असून, वाहनचालकांचा प्रवासही सुखकर होणार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी दैनिक 'पुढारी'ने लोकहिताचा प्रश्न सातत्याने मांडल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
"गेल्या महिनाभरापासून महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवास करताना मोठा त्रास होत होता. टोल प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नव्हती. मात्र, दैनिक 'पुढारी'मध्ये बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. याबद्दल सर्व नागरिकांकडून दैनिक 'पुढारी'चे मनःपूर्वक आभार."— गोरख पवार, राहुड