जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड वस्ती परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, भररात्री एका घराच्या मागील दरवाजाला चक्क भोक पाडून आत प्रवेश करत अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांच्या या धाडसामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून 'खाकी'च्या गस्तीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण गोविंदा दगडे (वय ४२, रा. पूर्णाड वस्ती) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. २२ फेब्रुवारी रोजी रात्री १.०० ते १.३० वाजेच्या सुमारास, जेव्हा सर्व गावकरी गाढ झोपेत होते, तेव्हा दोन अज्ञात चोरट्यांनी दगडे यांच्या घराच्या मागील लाकडी दरवाजाला लक्ष्य केले. चोरट्यांनी दरवाजाला भोक पाडून आतील कडी उघडली आणि घरात प्रवेश केला. पुढच्या खोलीत असलेल्या पत्राच्या कोठीत ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रकमेवर या भामट्यांनी डल्ला मारला.
वडीलोपार्जित दागिन्यांवर डल्ला
या घरफोडीत चोरट्यांनी एकूण २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ७० हजार रुपये किमतीच्या २० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ४ अंगठ्या.
२४ हजार ५०० रुपये किमतीची ७ ग्रॅमची सोन्याची चैन.१७ हजार ५०० रुपये किमतीची सोन्याची नथ.
३० हजार रुपये किमतीच्या ६ ग्रॅमच्या ३ जोड सोन्याच्या बाळ्या.
रोख रक्कम: १ लाख रुपये (५०० रुपयांच्या २०० नोटा).
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. लक्ष्मण दगडे यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ००६१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मात्र, अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही.