नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिककरांची पाण्याची चिंता मिटली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर या प्रमुख धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून, मुकणे धरण सुमारे ६४ टक्के भरले आहे. तर गंगापूर धरणाचा पाणीसाठाही ९८ टक्क्यांपर्यंत गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात विसर्ग करून ८० टक्क्यांपर्यंत नियंत्रित करण्यात आला असून, अजूनही या धरणातून सुमारे १२९६ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
नाशिक शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या मुकणे धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. या धरणात सध्या ६४.१ टक्के भरले आहे. या धरणात सध्या ४६३४ दशलक्ष घनफूट (दलघफू) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षाच्या तुलनेत अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने मुकणे धरणातून अद्याप पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाही. मुकणे धरणातील या वाढत्या जलसाठ्यामुळे तसेच गंगापूर धरणात अपेक्षित साठा असल्याने नाशिक शहरावरील पाण्याचे संकट टळले असून, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काश्यपी धरण ८९.१० टक्के भरले असून, या धरणातून ५०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. गौतमी गोदावरी ८९.५१ टक्के भरले असून, या धरणातून होणारा विसर्ग सध्या थांबवण्यात आला आहे. तर आळंदी धरण १०० टक्के भरले असून, ४४६ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरण समूहाचा एकूण विचार केला तर या समूहात सध्या ८५.२५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
जिल्ह्यातील बहुतांश सर्वच धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली असताना नांदगाव तालुक्यातील पांझण नदीवरील नागासाक्या धरण अजूनही कोरडे आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
या धरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह खरीप हंगामातील शेतीची चिंता वाढली आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र केवळ २ ते ३ किलोमीटरच्या आसपास असल्याने स्थानिक पातळीवर दमदार पाऊस पडल्याशिवाय यात पाणी येत नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.