नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक- पुणे रेल्वे मार्ग रद्द करण्याचा घाट केंद्र शासनाच्या मंत्रालयाने घातला आहे, असा थेट आरोप करीत आमदार सत्यजित तांबे यांनी दि. ९ ऑगस्ट रोजी नाशिक - पुणे रस्त्यावर विविध ठिकाणी तसेच समृद्धी महामार्गावर रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. आंदोलनात नाशिककरांनी उतरण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या रेल्वे प्रकल्पात कोणीही राजकारण आणू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. येथे सोमवारी (दि. ६) आमदार तांबे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, यापूर्वी दि. २९ जून रोजी आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता.
मात्र, नाशिक जिल्हा प्रशासनाच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या विषयावर बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी यावर तज्ज्ञांची समिती नेमण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सध्या तरी आंदोलन स्थगित केले आहे. यानंतर, लोकप्रतिनिधी तसेच रेल्वे कृती समितीसोबतही बैठका झाल्या आहेत. मात्र, अद्यापही कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत.
मागण्या मान्य न झाल्यास ९ ऑगस्टला नाशिक पुणे या रस्त्यावरील अनेक तालुक्यांतील रेल्वे कृती समितीच्या माध्यमातून सकाळी ९ ला महामार्गावर उतरून लोक रास्ता रोको करतील आणि सरकारला जाब विचारतील. तांबे म्हणाले की, नफा तोट्याचा विचार न करता नाशिक -पुणे रेल्वे सरळ मार्गानच झाला पाहिजे.
खोडद येथील जेएमआरटीचे कारण सांगून, हा मार्ग नाशिक शिर्डी असा वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा नवा मार्ग पूर्णपणे अव्यवहार्य असून, तो कधीही नफ्यात येऊ शकत नाही. यात कुठे तरी राजकारणाचा संशय येत असून, या राजकारणात सर्वसामान्य माणूस भरडला जाऊ नये, तर नाशिककरांसाठी रेल्वे मार्ग हवा आहे असे त्यांनी सांगितले. भूसंपादनाच्या मुद्द्यावर बोलताना तांबे यांनी ही सरळ सरळ प्रशासकीय चूक असल्याचे सांगितले.
नाशिककरांना 'समृद्धी'चा फायदा शून्य
समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी नाशिककरांना इगतपुरीपर्यंत दीड तास प्रवास करीत दोन टोल भरावे लागत असल्यामुळे त्यांना याचा कोणताही फायदा होत नाही. वाडीव-हे जंक्शनच्या केवळ कागदावर गप्पा न मारता, सरकारने नाशिककरांना न्याय देण्यासाठी भरवीर कनेक्टरचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी आमदार तांबे यांनी यावेळी केली.