नाशिक : दिलीप सूर्यवंशी
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. गत वर्षभरात गौणखनिज माफियांना तब्बल 2 कोटी 51 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या 176 वाहनांवर कारवाई करण्यात आली, तर 40 वाहने तहसील कार्यालयाकडून जप्त करण्यात आली आहेत. या शिवाय 5 प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांत गत वर्षभरात अवैध वाळू, दगड, माती आणि मुरूम उत्खनन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या उत्खननामुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर होतोच दुसरीकडे गौणखनिज चोरीमुळे शासनाचा महसूलही बुडत आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. अवैध उत्खननाविरोधात नाशिक, निफाड, इगतपुरी, देवळ्यात सर्वाधिक कारवाई करण्यात झाली आहे. महसूल प्रशासनाच्या कठोर कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत. गत वर्षभरात कारवाई करताना जिल्हा प्रशासनाने 2 कोटी 51 लाख 21 हजार 852 रुपयांचा दंड ठोठावला आहे. यातील 1 कोटी 76 लाख 39 हजार 544 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर 74 लाख 82 हजार 308 रुपयांचा दंड वसूल करणे बाकी आहे. याप्रकरणी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांकडून तब्बल 40 वाहने जप्त करण्यात आली असून, 5 प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील नाशिक, निफाड, इगतपुरी, देवळा या तालुक्यांतून अवैध उत्खनन होत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली. कारवाईत नाशिकमध्ये 46 लाख, निफाडमधून 36 लाख, इगतपुरीत 32 लाख, तर देवळ्यातून 16 लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
गौणखनिजाचे उत्खनन करताना शासनाला रॉयल्टी भरणे अत्यावश्यक आहे. रॉयल्टी न भरता उत्खनन करणे कारवाईस पात्र आहे. जिल्ह्यात अवैध उत्खनन करणाऱ्यांविरोधात शासनाकडून कठोर कारवाई करण्यात येते. नियमाप्रमाणेच गौणखनिजाचे उत्खनन करता येईल. अवैध माफियांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.आबासाहेब तांबे, जिल्हा खनिकर्म अधिकारी, नाशिक जिल्हा