नाशिक : आदिवासी आरक्षणासाठी काही निकष असून, त्याची काही प्रक्रिया आहे. त्या निकषानुसारच आरक्षण मिळत असते. त्यामुळे कोणी कितीही उड्या मारल्या म्हणजे आरक्षण मिळते असे होत नसल्याचे म्हणत आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी नाव न घेता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला. आंदोलनातून आदिवासी समाज गरज नसताना आरक्षणावरून आक्रमक होत असेल, तर धनगर समाजसुद्धा आपली ताकद दाखवून देईल, असे आमदार पडळकर म्हणाले होते.
महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या वतीने रविवारी (दि. २२) आदिवासी कार्यकर्ता संमेलन आयोजित केले होते. यासाठी नाशिकमध्ये आले असता मंत्री डॉ. गावित यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा अध्यादेश काढण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यावर आदिवासी नेते एकवटले असून, या नेत्यांची बैठक सोमवारी (दि. २३) मुंबईत होत आहे. या बैठकीबाबत डॉ. गावित म्हणाले, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत ही बैठक होत असून, त्या बैठकीला जाणार आहे. बैठकीत आरक्षणाबाबत चर्चा करणार आहे. आदिवासी कोण आहे, ते कसे ठरविले जाते याची एक प्रक्रिया आहे. यात जे बसणार त्यांना आरक्षण मिळते. मात्र, जे बसत नाही, त्यांना आरक्षण मिळणार नाही. केवळ आम्हाला यातून आरक्षण पाहिजे असे म्हणून आरक्षण मिळते का ? असा सवाल डॉ गावित यांनी उपस्थितीत करत आरक्षणात एखाद्या जातीला घालता पण येत नाही अन् काढता येत नाही. आरक्षण मिळविण्याची कायद्याची प्रक्रिया आहे. त्यानुसारच, आरक्षण दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, माजी खासदार हिना गावित आदी उपस्थित होते.
आदिवासी आरक्षणाबाबत भाजपची जी भूमिका आहे, तीच राज्य सरकारची भूमिका आहे. मात्र, आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. या अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे आरक्षणाबाबत आदिवासी समाज जी भूमिका घेईल, त्याच्यासोबत राहणार असल्याचे मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी स्पष्ट केले.