नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलकांना आज समाजात आणि राजकारणात कोणीही विचारत नाही. त्यांच्या पाठीशी कोणतीही जनता नाही आणि कोणतीही जनशक्ती नाही. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि स्वतःचे राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी चाललेला हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे, या शब्दांत कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. येथे रविवारी (दि. ५) प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या 'रामरक्षा आंदोलना'वर जोरदार हल्लाबोल केला.
मंत्री महाजन म्हणाले की, ज्यांना पक्षात राहायचे आहे, त्यांनी राहावे आणि ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे, असे सांगण्याची हतबलता उद्धव ठाकरेंवर आली आहे. आपला पक्ष वाचवण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील. तो त्यांचा पक्ष आहे. मात्र, आता दरवाजा बंद केला, तरी पक्षात उरलेले लोक थांबायला तयार नाहीत, असा थेट आणि घणाघाती टोलाही त्यांनी ठाकरेंचे नाव न घेता त्यांना लगावला.
विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या टीकेबाबत विचारले असता मंत्री महाजन म्हणाले की, घरात बसून टीव्हीवर बाइट दिल्याने आणि सकाळी एक भोंगा सुरू केल्याने पक्ष चालत नाही; त्यासाठी राज्यभर फिरून संघटन मजबूत करावे लागते. भाजपची देशात ७५-८० टक्के राज्यांत सत्ता आहे, ती घरात बसून केवळ शिव्या घातल्याने आलेली नाही, तर जनतेत जाऊन काम केल्यामुळे आली आहे.
आम्ही राजे आहोत आणि जनता प्रजा, या भ्रमात राहू नका; लोकशाहीत जनताच राजा असते, असा सणसणीत टोलाही महाजन यांनी यावेळी लगावला. खा. संजय राऊत मनात येईल तसे खोक्यांचे आकडे सांगून नुसती बडबड करत आहेत, त्यापेक्षा त्यांनी आपला उरलेला पक्ष आणि लोक सांभाळावेत.
संघटना मजबूत केली नाही तर त्यांचा पक्ष टिकणार नाही, असा सल्ला मंत्री महाजन यांनी दिला. तसेच आ. रोहित पवारांवर निशाणा साधताना मंत्री महाजन म्हणाले की, कारवाईची भीती दाखवून पवारांना आधीच आपल्या चुकीच्या कामांची चाहूल लागलेली दिसत आहे. विनाकारण कोणावरही कारवाई होत नाही; जर तुम्ही चोरी-चपाटी किंवा मोठी घबाडं केली असतील, तर चौकशी आणि कारवाई निश्चितच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिककरांना तात्पुरता त्रास
पावसामुळे शहरातील विस्कळीत झालेल्या वाहतूक व्यवस्थेवर बोलताना मंत्री महाजन महाजन म्हणाले की, शहरात सध्या ७ ते ८ हजार कोटींची विकासकामे अत्यंत गतीने सुरू असून, यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल मी नाशिककरांची मनापासून माफी मागतो आणि त्यांनी हा तात्पुरता त्रास सहन करावा. कॅनॉल रोडसह संपूर्ण रस्ते आपण नवीन करत असून, मायको सर्कल परिसरातही अतिशय दर्जेदार काम सुरू आहे.
विकासकामांच्या बाबतीत कुठेही तडजोड न करता सर्व यंत्रणा स्वतः फिल्डवर उतरून रात्रंदिवस काम करत आहेत. सध्या पाऊस पडत असल्याने रस्त्यांवर चिखल होऊन काहीसा त्रास निश्चित होणार आहे, परंतु एवढी मोठी हजारो कोटींची कामे लगेच पूर्ण होणारी नसल्याने नागरिकांनी थोडा संयम ठेवावा. आज होत असलेला हा त्रास सहन केल्यास कामे पूर्ण झाल्यावर नाशिककरांचे वाहतुकीचे भविष्य अत्यंत उत्तम आणि सुखकर होणार आहे, यात शंका नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.