मनमाड : पुढारी वृत्तसेवा
ईदगाह भागात तरुणाच्या हत्येनंतर फरार झालेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी वेगवेगळ्या भागांत छापा मारत सहा संशयितांना अटक केली. सर्व संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता २६ मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
मनमाडला भरवस्तीत खुनाच्या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले होते. पोलिसांनी अवघ्या काही तासांत संशयितांचा शोध घेतला. ईदगाह भागातील सुदर्शन चव्हाण हा नवी मुंबईत बाउन्सर म्हणून काम करत होता.
दोन दिवसांपूर्वी त्याचा साखरपुडा असल्याने घरी आला होता. ईदगाह भागात राहणारे अविनाश बागडे, नीलेश बागडे, तुषार गायकवाड, क्षितिज बहोत यांच्यासोबत त्याचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता.
सुदर्शन हा मनमाडला आल्याचे या चौघांना समजताच त्यांनी रविवारी रात्री सुदर्शनच्या घरी जात असताना त्याला ईदगाह पुलाजवळ अडवत वाद घातला. जुन्या भांडणाची कुरापत काढून त्याच्यावर तलवार, कोयत्याने वार केल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर सर्व आरोपी फरार झाले होते.
पोलिस निरीक्षक विजय करे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. पोलिसांनी सापळा रचून अविनाश बागडे, नीलेश बागडे, तुषार गायकवाड, क्षितिज बहोत यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना मदत करणारे साहिल गायकवाड आणि सिद्धेश शेळके यांनाही अटक केली. सर्वाविरुद्ध हत्येसह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.