नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बारामतीत विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, असा दावा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केलेली असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. त्या निर्णय घेतील.
फक्त सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत. बाकी कोणी होणार नाही. सह्या करो किंवा न करो, आमची चर्चा झाली आहे. उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच असतील आणि सगळ्या महत्त्वाच्या पदावर वहिणीच असतील, असे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ठणकावून सांगितले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मंत्री कोकाटे यांनी याबाबत भूमिका मांडली. कोकाटे म्हणाले की, आम्ही संपूर्ण अस्थीकलश मुंबईत आणले. प्रत्येक जिल्ह्यात हे अस्थीकलश नेण्यात येणार आहे. नंतर विधिवत त्याचे पूजन करण्यात येईल. काही ठिकाणी शोकसभादेखील घेत आहोत. ३६ च्या ३६ जिल्ह्यांत हे कलश नेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
कोकाटे पुढे म्हणाले की, मला एक समजत नाही की, विलीनीकरणाबाबत का चर्चा करत आहेत. हा प्रश्न कौटुंबिक आहे. त्यात काय चर्चा झाली, याबाबत आम्हाला माहीत नाही. आम्हाला माहिती मिळत नाही, तोपर्यंत आम्ही काही बोलणार नाही. जी चर्चा आहे ती वहिनींसोबत अजितदादांनी केली असणार. आम्हाला काही माहीत नाही.
सगळे वहिनींसोबत चर्चा करतील आणि त्या जो निर्णय घेतील, तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल, असेदेखील कोकाटे यांनी यावेळी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार या पक्षाच्या नेत्या आहेत, त्या पक्षाबाबत निर्णय घेतील. केवळ सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत. उत्तराधिकारी त्या असल्याने सगळ्या महत्त्वाच्या पदावर त्या असतील, असे माणिकराव कोकाटे यांनी यावेळी सांगितले.