नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उद्योग, व्यापार, कृषी क्षेत्रासाठीची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या द्वैवार्षिक निवडणुकीत एकता, प्रगती विरुद्ध विकास असा सामना रंगण्याची शक्यता आहे. या तिन्ही पॅनलकडून उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदासह गव्हर्निंग काउन्सिलच्या २७ जागांसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि. २२) त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
शताब्दी महोत्सव साजरा करीत असलेल्या महाराष्ट्र चेंबरमध्ये बिनविरोध पदाधिकारी निवडीचा पायंडा होता. मात्र, काही वर्षांमध्ये संस्थेत गटा-तटाच्या राजकारणाने सर्व मर्यादा ओलांडल्यामुळे बिनविरोध निवडीची शक्यता धुसर आहे. उत्तर महाराष्ट्रातील एका उपाध्यक्ष पदासह नाशिकमधील गव्हर्निंग काउन्सिलच्या २७, धुळे ४, तर जळगाव ५ या जागांसाठी तीन पॅनल आमनेसामने आले आहेत.
या तिन्ही पॅनलमधील इच्छुकांनी संस्थेत एकत्र पदाधिकारी म्हणून काम केले आहे. मात्र, आता तिघांनीही वेगळी चूल मांडल्यामुळे निवडणूक अटळ मानली जात आहे. चेंबरचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा यांचे एकता पॅनल, विद्यमान उपाध्यक्ष संजय सोनवणे यांचे उत्तर महाराष्ट्र विकास पॅनल, तर माजी उपाध्यक्ष कांतिलाल चोपडा यांचे शेठ वालचंद, हिराचंद प्रगती पॅनल मैदानात उतरले आहे. तिन्ही पॅनलकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, एकता पॅनलकडून उपाध्यक्ष पदासाठी ५ अर्ज दाखल केले असून, त्यात सुनीता फाल्गुने, सचिन शाह, राजाराम सांगळे, दीपाली चांडक, अंजू सिंघल यांचा समावेश आहे. विकास पॅनलकडून संजय सोनवणे यांचा एकमेव अर्ज आहे, तर प्रगती पॅनलकडून कांतिलाल चोपडा, संजय राठी, रतन पडवळ यांनी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय गव्हर्निंग काउन्सिलच्या २७ जागांसाठी एकता पॅनलकडून ४२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
प्रगती पॅनलने ६४ अर्ज दाखल केले असून, विकास पॅनलकडून ११ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय धुळे आणि जळगावमधील प्रत्येकी चार आणि पाच जागांसाठी देखील अर्ज दाखल होणार आहेत. दरम्यान, दि. २५ मे रोजी अर्जाची छाननी होणार असून, पात्र उमेदवारांची यादी २६ मे रोजी जाहीर केली जाणार आहे. २९ मे रोजी उमेदवारी अर्ज माघारीनंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
तडजोडीसाठी दरवाजे खुले
एका पॅनलने तडजोडीसाठी आपले दरवाजे खुले ठेवल्याचीही माहिती आहे. या पॅनलच्या नेत्याला दुसऱ्या एका पॅनलकडून वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता असल्यामुळे माघारीपर्यंत हा पॅनल राहणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तूर्त तिन्ही पॅनलकडून विजयाचा दावा केला जात आहे.
३५० नूतन सभासद ठरणार निर्णायक
नाशिकमधील गव्हर्निंग काउन्सिलच्या २७ जागांचे भवितव्य १,५६४ इतक्या मतदारांच्या हाती आहे. त्यातील ३५० मतदार हे नूतन असून, सत्ताधारी गटाने या मतदारांची नोंदणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे हे मतदार निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे धुळ्यातील ४ जागांसाठी ११९, तर जळगावमधील ५ जागांसाठी १८६ मतदार आहेत.