नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उद्योग, व्यापार, कृषी क्षेत्रासाठीची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या द्वैवार्षिक निवडणुकीची रंगत वाढत असून, दोन्ही पॅनलनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे. नाशिक उपाध्यक्ष आणि गव्हर्निंग काउन्सिलच्या २७ जागांसाठी १५६४ इतके मतदान असून, त्यातील बहुतांश मतदान ग्रामीण भागातील असल्याने निवडणुकीत ते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
याशिवाय अखेरच्या टप्प्यात ३५० सभासदांची नोंदणीदेखील निवडणुकीचा कौल निश्चित करणार असल्याने, तो नेमका कोणास मिळणार याबाबत उत्सुकता लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते अंतिम उमेदवारी यादी जाहीर होईपर्यंत रंगलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे महाराष्ट्र चेंबरची निवडणूक चर्चेत आहे.
निवडणुकीत एकता पॅनल पूर्ण ताकदीनिशी उतरले असून, शेठ हिराचंद, वालचंद प्रगती पॅनल एक उपाध्यक्षपद आणि २७ पैकी ७ गव्हर्निंग काउन्सिलच्या उमेदवारांसह मैदानात आहे. सध्या दोन्ही पॅनलकडून जोरदार प्रचार केला जात आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातदेखील प्रचार दौरे काढले जात आहेत.
नाशिक गव्र्व्हनिंग काउन्सिलच्या २७ जागांसाठी एकूण १,५६४ इतके मतदान आहे. त्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा येथून २१५ इतके मतदान आहे, तर अखेरच्या टप्प्यात इगतपुरी, दिंडोरी आणि नाशिकमधून ३५० सभासदांची नव्याने नोंदणी केल्यामुळे त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. दरम्यान, दोन्ही पॅनलचा या मतांवर डोळा असून, त्यांना आकर्षित करण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत. दि. ११ ते १३ जूनदरम्यान मतदान असल्याने, पॅनलकडून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या जात असल्याने, निवडणूक रंगत वाढली आहे.
चेंबर भवनचा मुद्दा ठरतोय प्रभावी
सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये उभारले जात असलेले महाराष्ट्र चेंबरचे प्रशस्त भवन प्रचारातील प्रभावी मुद्दा ठरताना दिसून येत आहे. हे भवन उभारण्यात आपलेच योगदान असल्याचा दावा दोन्ही पॅनलकडून केला जात आहे. वास्तविक, हे भवन उभारण्याची मागणी २०१८-१९ मध्ये तत्कालीन अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केली होती. त्यानंतर ललित गांधी यांच्या कार्याकाळात जागा संपादनाची प्रक्रिया पार पडली, तर प्रभारी अध्यक्ष रवींद्र मानगावे यांच्या कार्यकाळात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.