दिंडोरी : तालुक्यातील पूर्व भागामध्ये वरखेडा, परमोरी, जोपुळ, कोंबडवाडी, पालखेड बंधारा, कोराटे, खडक सुकेणे आदी गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वन विभागाला माहिती देताच वरखेडा येथे पिंजरा लावण्यात आला आहे.
वरखेडा येथील शेतकरी किरण उगले यांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या वासरावर बिबट्याने पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान हल्ला करून ठार केले. किरण उगले यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. दुसऱ्या दिवशीही कोंबडवाडी येथील खंडेराव सूर्यवंशी यांच्या शेताकडे बिबट्याने नागरिकांना दर्शन दिले. ग्रामपंचायतीने पिंजरा लावण्यात यावा या आशयाचे पत्र वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाने तात्काळ या परिसरात पिंजरा लावला आहे. यावेळी वनपरिक्षेत्र मंडळ अधिकारी रामचंद्र तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ, अण्णा टेकनार, हेमराज महाले, दशरथ कडाळे, परशुराम भोई, चेतन गवळी, आदींनी पिंजरा लावून वासराचा पंचनामा केला. याप्रसंगी बाळासाहेब गडकरी, राजाराम सूर्यवंशी, राजू सोनवणे उपस्थित होते.