नाशिक : तपोवनात वृक्षप्रेमींशी संवाद साधताना कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, समवेत आमदार देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर. Pudhari News Network
नाशिक

Kumbh Mela Nashik : एका वृक्षाच्या बदल्यात 10 रोपांची लागवड करणार

कुंभमेळा मंत्री महाजन यांची ग्वाही : तपोवनात वृक्षप्रेमींशी साधला संवाद

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी कुंभमेळ्यानिमित्त देश विदेशातील साधू- महंत नाशिकला येतील. त्यांच्यासाठी साधूग्राम येथे व्यवस्था करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक तेवढेच वृक्ष काढण्यात येतील. ज्या वृक्षांचे पुनर्रोपण करणे शक्य आहे ते अन्यत्र स्थलांतरीत करण्यात येतील. एका वृक्षाच्या बदल्यात १० रोपांची लागवड करत त्यांचे संवर्धन करण्यात येईल, अशी ग्वाही कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिली

महापालिकेने साधूग्रामच्या जागेवरील वृक्ष हटवण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. या वृक्षतोडीला वृक्षप्रेमींकडून कडाडून विरोध केला जात आहे. बुधवारी (दि.१९) वृक्षप्रेमींनी तपोवनात वृक्षांना आलिंगन देत 'चिपको' आंदोलन केले. मनसेने देखील आंदोलन करत वृक्षतोडीला विरोध दर्शवला. या पार्श्वभूमीवर मंत्री महाजन यांनी गुरुवारी (दि.२०) सकाळी तपोवन परिसरास भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार प्रा. देवयानी फरांदे, महापालिका आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नाशिक : तपोवनात वृक्षप्रेमींशी संवाद साधताना कुंभमेळामंत्री गिरीश महाजन. समवेत आमदार देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरीक्त आयुक्त करिश्मा नायर.

मंत्री महाजन यांनी सांगितले की, राज्य शासन पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कटिबद्ध आहे. साधूग्रामच्या जागेतील जुन्या वृक्षांना कोणताही धोका नाही. मागील आराखड्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल. ते करताना निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. फाशीचा डोंगर, पेठरोड परिसरात नव्याने रोपांची लागवड करत त्याचे संवर्धन केले जाईल. कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित आणि हरित होण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. गोदावरी नदी वर्षभर प्रवाहित राहील यासाठी उपाययोजना केल्या जातील. साधूग्राम संपादित जमिनीचा मोबदला देण्याची कार्यवाही लवकरच पूर्ण होईल. नाशिक शहरात रस्त्यावर मध्यभागी असलेले जीर्ण आणि अपघातांना कारणीभूत वृक्ष काढून टाकण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही आवाहन मंत्री महाजन यांनी केले.

रस्ते दुरुस्तीला गती

नाशिक शहरातील खड्डे बुजवण्याच्या कामाला गती देत रस्ते दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. आगामी काळात रस्ते व्हाइट टॅपिंग, सिमेंटचे करण्यावर भर राहील. त्यामुळे रस्ते कायमस्वरुपी टिकून राहण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. महापालिकेच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त खत्री यांनी दिली.

रस्त्यावरील वृक्षाच्या बदल्यात ५० वृक्ष

शहरात रस्त्यावर मध्यभागी असलेले जीर्ण वृक्षांमुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. या अपघातामुळे अनेकांचे जीव जात आहेत. ते आपल्याच कुटूंबातील आहेत. त्यामुळे अशा जीर्ण आणि अपघातांना कारणीभूत वृक्ष काढून टाकण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही आवाहन करताना रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या एक वृक्षाच्या बदल्यात आम्ही ५० वृक्ष लावू, अशी ग्वाही महाजन यांनी दिली.

शिंदेसेनेची नव्हे उबाठाची माणसे घेतली

पक्षप्रवेशावरून महायुतीत कोणतेही वाद नाहीत. मालेगावमध्ये अद्वय हिरे हे शिंदेसेनेतून नव्हे तर उबाठातून भाजपमध्ये आले आहेत. शिंदेसेनेतून माणसे घेतली असती तर ठिक होते असे सांगत, महाजन यांनी आमच्यात तणाव नसल्याचाही दावा केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT