नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील रस्ते खड्ड्यांमुळे जीवघेणे बनलेले असताना नाशिककरांनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलनांची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन आणि सरकारविरोधात वाढता असंतोष लक्षात घेत कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात बोलावलेल्या बैठकीला सलग दुसऱ्या दिवशीही एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली.
त्यामुळे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी एमएनजीएलचे व्यावसायिक कार्यप्रमुख शंकर करजगी यांना फोनवरून सोमवारी बैठकीला उपस्थित राहून कंपनीची बाजू मांडण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात उपाययोजना करण्यासाठी तसेच विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात शनिवारी (दि. १) बैठक घेतली. या वेळी आमदार देवयानी फरांदे, महापौर हिमगौरी आडके, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनिषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद.
बैठकीत मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामांसंदर्भात एमएनजीएलच्या खोदकामांचा अडथळा असल्याचे नमूद केले. एमएनजीएलला ३० ऑगस्टपर्यंत रस्ते खोदण्याची मुदत आहे. त्यामुळे दुरुस्त केलेले रस्ते पुन्हा खोदले जात असल्याचे सांगत शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांवर उपाय करण्यात हतबलता व्यक्त केली. त्यावर कुंभमेळामंत्री महाजन यांनी एमएनजीएलच्या प्रतिनिधीला बाजू मांडण्यास सांगितले.
परंतु, एमएनजीएलचा कोणताही प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे या विषयावर शुक्रवारी (दि. ३१) मनपा आयुक्तालयात झालेल्या बैठकीलाही एमएनजीएलचा प्रतिनिधी उपस्थित नव्हता. सलग दोन दिवस एमएनजीएलचा कोणताही प्रतिनिधी बैठकीला उपस्थित नसल्याने मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी एमएनजीएलचे प्रभारी अधिकारी श्रीवास्तव यांना फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनीही फोन घेतला नाही. आता सोमवारी होणाऱ्या बैठकीत नेमके काय होणार, पुन्हा एमएनजीएलचे प्रतिनिधी दांडी मारणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
आयुक्त खत्री यांनी एमएनजीएलचे व्यावसायिक कार्यप्रमुख शंकर करजगी यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी बैठकीत ऑनलाईन उपस्थिती लावली. मात्र, आपण प्रवासात असल्याने आवाज स्पष्ट येत नसल्याचे कारण सांगत अधिक बोलणे टाळले. त्यावर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी करजगी यांना चांगलेच धारेवर धरत कुंभमेळा तोंडावर आलेला असताना रस्त्यांची दुरुस्ती होऊ शकत नाही. रस्त्यांची कामे केव्हा करायची, असा प्रश्न केला.
कंपनीचा कोणताही प्रतिनिधी बैठकीला उपस्थित नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. त्यावर करजगी यांनी लवकर कंपनीचे प्रतिनिधी आपली भेट घेतील, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंत्री महाजन यांनी आपणच सोमवारी कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहून कंपनीची भूमिका स्पष्ट करावी, असा अल्टिमेटम दिला.