जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जुन्या नाशकातील काझीगढीचा काही भाग पुन्हा ढासळल्याने गढीवासीयांची चिंता वाढली आहे. जीव मुठीत घेऊन नागरिक या गढीवर राहत असून, गढीला संरक्षक भिंत उभारणे तर सोडाच पण पावसाच्या पार्श्वभूमीवर केवळ नोटिसांचे सोपस्कार पार पाडणाऱ्या प्रशासनाने गढीवासीयांच्या स्थलांतराबाबतही निष्क्रियता दाखविल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काझीगढीच्या संरक्षण भिंतीसाठी शासनाने तब्बल 36 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र अद्याप कामाला सुरुवात झालेली नाही. सलग सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी सुमारे 6 ते 6.30 च्या दरम्यान काझीगढी परिसरात दोन ते तीन ठिकाणी माती सरकली.
घराचा काही भाग कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक रहिवासी प्रल्हाद भिकाजी खैरनार यांनी सांगितले की, त्यांचे कुटुंब गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून गढीवर वास्तव्यास आहे.
दरवेळी प्रशासनाकडून गढीला संरक्षक भिंत बांधण्याचे आश्वासन दिले जाते, मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम होत नाही. भिंत कोसळू नये म्हणून घरांसमोर उभारलेले बांबूचे तात्पुरते संरक्षण स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या खर्चाने उभारल्याचे त्यांनी सांगितले.
संरक्षक भिंतीचा प्रश्न ऐरणीवर
रहिवासी सांडू शाह (वय ६०) यांनी सांगितले की, ते गेल्या आठ महिन्यांपासून येथे राहत आहेत. मात्र सध्याची परिस्थिती पाहता आता हे घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सतत भिंत कोसळण्याच्या भीतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काझीगढीच्या भिंतीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, यंदाच्या पावसाने पुन्हा एकदा या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे.