Banana Plantation Destroyed (छाया : ओम देसाई)
नाशिक

Banana Plantation Destroyed | डोईवर कर्ज; बाग मात्र करपली

Banana Plantation Destroyed | केळीला अवकाळी, गारपीट आणि उन्हाचा तिहेरी फटका

पुढारी वृत्तसेवा

जायखेडा : पुढारी वृत्तसेवा

कर्ज काढून बाग उभी केली लेकरांसारखी झाडे जपली, दिवस-रात्र कष्ट केले पण आता ना पीक शिल्लक राहिले, ना त्याला भाव मिळतोय अशी हृदयद्रावक भावना व्यक्त करत बागलाण तालुक्यातील जायखेड्यासह परिसरातील केळी उत्पादक शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. नैसर्गिक संकटांच्या मालिकेनंतर आता भावघसरणीने शेतकऱ्यांच्या बाजारातील जखमेवर मीठ चोळले आहे.

बागलाण तालुक्यातील शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून सततच्या संकटांचा सामना करत आहेत. आधी अवकाळी पावसाने केळी बागांचे मोठे नुकसान केले. त्यानंतर झालेल्या गारपिटीमुळे उरलेसुरले पीकही बाधित झाले. अनेक ठिकाणी केळीची झाडे आडवी झाली, पाने फाटली, तर घडांचे मोठे नुकसान झाले.

मात्र या संकटांनंतरही शेतकऱ्यांनी हार न मानता पुन्हा कर्ज काढून खते, औषधे आणि मजुरीचा खर्च करीत बागा उभ्या केल्या. मात्र, आता वाढत्या तापमानाने आणि तीव्र पाणीटंचाईने केळी बागा अक्षरशः करपू लागल्या आहेत. तालुक्यात तापमान ४२ अंशांच्या पुढे गेल्याने शेतातील हिरवळ जळून जात आहे. अनेक ठिकाणी केळीची पाने सुकून वाकडी झाली असून, घडांची वाढ थांबली आहे. काही भागांत संपूर्ण बागा वाळून गेल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकरी डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होणाऱ्या बागा पाहून अश्रू ढाळताना दिसत आहेत.

नैसर्गिक संकटांमुळे उत्पादन घटले असतानाच, बाजारात केळीला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. उत्पादनासाठी लाखो रुपये खर्च करूनही व्यापाऱ्यांकडून अत्यंत कमी दर दिला जात असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. एक घड तयार करण्यासाठी जितका खर्च होतो, तेवढे पैसेही आता मिळत नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक शेतकरी देत आहेत.

दरम्यान, विहिरींची पाणीपातळी झपाट्याने घटत असून, अनियमित वीजपुरवठ्यामुळे वेळेवर सिंचनही होत नाही. रात्रभर मोटार सुरू होण्याची वाट पाहाणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आता चिंता आणि नैराश्य स्पष्ट दिसत आहे. पीक वाचवायचे की संसार चालवायचा? असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे. उष्णतेचा फटका जनावरांनाही बसत असून, चाऱ्याअभावी आणि पाण्याच्या टंचाईमुळे जनावरे त्रस्त झाली आहेत. तहानेने व्याकुळ झालेले पक्षीदेखील गावोगावी पाण्याच्या शोधात भटकताना दिसत आहेत.

दुपारच्या वेळी गावातील रस्ते आणि बाजारपेठा ओस पडत असून, संपूर्ण परिसरावर उदासीनतेचे सावट पसरले आहे. शेतकरी जगला, तरच जग जगेल; पण आज त्यालाच जगणे कठीण झाले आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. शासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, केळीला हमीभाव जाहीर करावा तसेच वीज व पाणीपुरवठ्याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.

करपलेल्या बागेत जनावरे सोडण्याची वेळ

जायखेड्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या लग्नासाठी आणि संसाराच्या आशेवर कर्ज काढून केळी लागवड केली होती. मात्र आज त्याच बागा डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी मानसिकदृष्ट्‌याही खचले आहेत. काही ठिकाणी करपलेल्या केळी बागांमध्ये जनावरे सोडण्याची वेळ आली असून, लेकरांसारखी जपलेली झाडे जनावरांचा चारा होताना पाहून शेतकरी अक्षरशः कोसळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT