नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जेल रोड परिसरातील महारुद्र कॉलनी, वसंत बिहार येथील अरिंगळे चाळीत घडलेल्या मायलेकाच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी किरण एकनाथ हजारे याच्यावर सध्या बिटको रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतरच त्याचा जवाब नोंदवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
पत्नी अश्विनी हजारे (४३) आणि सातवर्षीय मुलगा श्रेयस हजारे यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्यानंतर किरण हजारेने स्वतःच्या हाताची नस कापून, विषारी औषध प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरोपीची प्रकृती सुधारल्यानंतरच नेमके हत्येचे कारण काय, हा प्रकार कोणत्या कारणातून घडला आणि त्यामागील हेतू काय होता, याबाबतचा खुलासा होण्याची शक्यता आहे. प्रथमदर्शनी पत्नी व अल्पवयीन मुलाची अत्यंत निर्दयपणे हत्या करण्यात आल्यामुळे आरोपीची मानसिक स्थिती विकृत असावी, असा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणेकडून व्यक्त केला जात आहे.
मात्र वैद्यकीय अहवाल, आरोपीचा जवाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारेच याबाबत अंतिम निष्कर्ष काढला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
प्राथमिक तपासानुसार, मूळ जळगाव येथील किरण हजारे आणि नाशिकरोड येथील अश्विनी हजारे यांचा २०१७ मध्ये पुनर्विवाह झाला होता. किरण हा रुग्णालयांना ऑक्सिजनपुरवठा तसेच सोलर प्रकल्पांच्या मार्केटिंगचे काम करत होता. हे कुटुंब गेल्या सात महिन्यांपासून वसंत बिहार परिसरात भाड्याने राहत होते.
रविवारी (दि. १९) रात्री तिघेही अश्विनी यांच्या माहेरी जेवणासाठी गेले होते. सोमवारी (दि. २०) सकाळी बराच वेळ घराचे दार न उघडल्याने शेजाऱ्यांना संशय आला.
खिडकीतून पाहिले असता, अश्विनी आणि श्रेयस हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. घरमालकाने डायल ११२ वर संपर्क साधल्यानंतर नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासात अश्विनी यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे, तर श्रेयसच्या गळ्यावर वार झाल्याचे आढळले.
या प्रकरणात आर्थिक विवंचना, कौटुंबिक वाद, मानसिक तणाव अथवा इतर कोणते कारण होते का, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. उपचारानंतर जवाब देण्याच्या स्थितीत आरोपी आल्यानंतर या दुहेरी हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.