नाशिक : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बालविवाह रोखलेला असतानाच सलग दुसऱ्या दिवशी इगतपुरीतील धारगाव येथील वडाचीवाडी येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह प्रशासनाने रोखला आहे. धारगाव येथे बालविवाह होत असल्याची कुणकुण लागताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी ही माहिती प्रशासनातील इतर विभागांना दिली.
यानंतर तत्काळ कारवाई करत हा बालविवाह रोखण्यात आला. स्थानिक प्रशासन, पोलिस तसेच ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे ही कारवाई यशस्वी झाली. धारगाव येथील वडाचीवाडी परिसरात कमी वयाच्या मुलीचा विवाह आयोजित करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ प्रशासनाला मिळाली.
ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. गटविकास अधिकारी महेश वळवी, घोटी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक उदे यांनी घटनास्थळी भेट देत कारवाई केली.
यावेळी धारगावचे ग्रामपंचायत अधिकारी, पाणीपुरवठा कर्मचारी, मंडळ अधिकारी पोटिंदे, तलाठी लिलके, अंगणवाडी सेविका व मदतनीस, ग्रामरोजगार सेवक तसेच स्थानिक संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
संबंधित कुटुंबीयांशी चर्चा करत बालविवाहाच्या दुष्परिणामांविषयी समजावून सांगण्यात आली. मुलगा व मुलीचे समुपदेशन करण्यात आले. बालविवाहामुळे मुलींच्या आरोग्यावर, मानसिक व बौद्धिक विकासावर तसेच शारीरिक वाढीवर गंभीर परिणाम होऊ शकतात. याबाबत प्रशासनाकडून सविस्तर माहिती देण्यात आली.
त्यानंतर कुटुंबीयांनी प्रशासनाच्या सूचनांना सहकार्य करत हा विवाह थांबवण्यास सहमती दर्शवली. मुलीच्या वडिलांनी मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतरच विवाह करण्याबाबत लेखी सहमती दिली.
प्रशासनाच्या जागरुकतेने बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.