नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी (दि. ३१) रात्री जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी तालुक्यांत मुसळधार पाऊस कोसलला. सुरगाण्यात सर्वाधिक १११, तर पेठमध्ये ८१ मिमी पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाने पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि दिंडोरी या तालुक्यांसाठी रेड अलर्ट जारी केला होता. त्यानुसार या भागात पावसाचा जोर पाहायला मिळाला.
जिल्हाभरात एकाच दिवसात सरासरी ३८.७ मिमी दमदार पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरीच्या १०४.५ टक्के पाऊस झाला. जिल्ह्यात जूनपासून ५७३.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सामान्यतः या कालावधीत ४९१.९ मिमी पाऊस पडतो. इगतपुरीत जूनपासून १,८६१.३ मिमी, त्र्यंबकेश्वरमध्ये १,८०८.९ मिमी विक्रमी पाऊस झाला.
सुरगाणा तालुक्यातही जूनपासून १,११८.० मिमी पाऊस पडल्याने तेथील टक्केवारी सरासरीच्या १५३.९ टक्क्यांवर पोहोचली आहे. या पावसामुळे गिरणा, गोदावरी आणि कादवा नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे दारणा, गंगापूर आणि भावली धरण समूहातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून, नद्या दुथडी वाहतात. त्यामुळे आगामी काळात पावसाची स्थिती कायम राहिल्यास, नद्यांना पूर वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यात असमतोल पावसाची नोंद झाली आहे. यात अत्यल्प पावसाचा तालुका म्हणून ओळख असलेल्या नांदगावमध्ये शुक्रवारी रात्री २१ मिमी पावसाची नोंद झाली. त्याचप्रमाणे येवला तालुक्यातही समाधानकारक पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
सुरगाणा: १११
पेठ: ८१
बागलाण: ५९.४
त्र्यंबकेश्वर: ५२.४
कळवण: ४०.२
इगतपुरी: ३५.३
दिंडोरी: ३४.३
नांदगाव: २१.७
देवळा: ४०.१
मालेगाव: ३७.१
निफाड: २८.२
नाशिक: २०.७
चांदवड: ३४.३
सिन्नर: ११.२
येवला: १०
जिल्ह्यात संततधारमुळे काही भागात पाणी साचले आहे. ग्रामीण भागातील काही रस्ते आणि लहान पूल पाण्याखाली गेले आहेत. सुरगाणा आणि पेठ तालुक्यांत वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. पुलावरून पाणी वाहात असताना नागरिकांनी रस्ता ओलांडण्याचे धाडस करू नये, धबधबे किंवा पर्यटन स्थळी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करतानाच मालेगाव, नांदगाव, बागलाण, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या आठ तालुक्यांतील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी शुक्रवारी रात्री दिल्या. त्यानुसार शनिवारी (दि. १) या भागातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.