येवला : गेल्या दोन तीन दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मृगाच्या पावसाने केवळ उन्हाची काहिलीच शमवली नाही, तर चातकासारखी पावसाची वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. राजापूर, अंदरसूल, नगरसूलसह ग्रामीण भागात पेरणी झालेल्या पिकांसाठी हा पाऊस 'अमृत' ठरला असून, जमिनीबाहेर कोवळे अंकुर डोलू लागले आहेत.
शेतांमध्ये सर्वत्र हिरवळ पसरल्यामुळे चैतन्याचे वातावरण पाहावयास मिळत आहे. जमिनीतून वर आलेले ते इवलेसे अंकुर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत आहेत. मका, प्रमुख पिकांची पेरणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यातही शेतकरी पिवळ्या सोन्याला (मका) अधिक पसंती देत आहे.
सर्वच ठिकाणी पिकांची उगवण जोमदार आणि समाधानकारक आहे. मक्याची कोवळी आणि सोयाबीन - भुईमुगाची जमिनीतून डोकावणाऱ्या हिरव्या पानांमुळे शिवाराचे सौंदर्य खुलले आहे. या (छाया : संतोष घोडेराव) पावसाने पिकांबरोबरच विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीतही सुधारणा होत आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास पाण्याची चिंता कमी होण्यास मदत होणार आहे.
कामांची लगबग सुरू
शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पिके जमिनीवर दिसू लागताच शेतांमध्ये खुरपणी, कोळपणी आणि इतर मशागतीच्या कामांसाठी लगबग सुरू आहे. निसर्गाने सुरुवातीलाच जोरदार साथ दिल्याने यंदा येवला तालुक्यात खरीप हंगाम भरघोस आणि सुफळ राहील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
थोडा उशिरा झाला, तरी पिकांसाठी संजीवनी देणारा ठरला आहे. अजूनही १० - १५ दिवस पाऊस आला नाही, तरी पिके तग धरू शकतील.
- रावसाहेब खैरनार, गारखेडे, शेतकरी
तालुक्यात मान्सून एक महिना उशिरा दाखल झाला असला, तरी खरिपातील पेरणीचे काम समाधानकारक आहे. संततधार पावसामुळे मातीमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने मका, बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, कापूस तसेच इतर खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
- संतोष गोसावी, सहायक कृषी अधिकारी, अंदरसूल