नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात सरकार येऊन दोन वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी अद्याप दोन जिल्ह्यांना पालकमंत्री दिलेला नाही. हे या महायुती सरकारचे निष्क्रियत्व, करंटेपणा आणि कोडगेपणाचे उदाहरण आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. कुंभमेळ्याच्या कामावरून सरकारला धारेवर धरताना सपकाळ म्हणाले की, नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सध्या जे काही चालले आहे, त्याद्वारे केवळ विष पसरवण्याचे काम सुरू आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी साधू-महंतांबाबत केलेली टिप्पणी ही अत्यंत अहंकाराची भाषा दर्शवणारी आहे. या अहंकारासोबतच नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामात जो प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे, त्या भ्रष्टाचाराची पाठराखण करण्याचे काम मंत्री महाजन करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.
अखिल भारतीय विकास परिषदेने शहरातील ईदगाह मैदानावर आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात रविवारी (दि. ९) प्रदेशाध्यक्ष सपकाळ बोलत होते. नाशिक - पुणे रेल्वे मार्ग संगमनेरमार्गेच व्हावा, या स्थानिक नागरिकांच्या लढ्याला पाठिंबा दर्शवत हा संघर्ष रास्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान संसदेत येत नाहीत, त्यामुळे भेटीबाबत अपेक्षा ठेवणे चुकीचे असून भाजपचे 'डिलिमिटेशन' धोरण हे देश व संविधानविरोधी असल्याची टीका त्यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनांवर सरकारने स्पष्टीकरण द्यावे आणि काँग्रेसच्या काळातील मराठा आरक्षण पूर्ववत करावे, अशी मागणी त्यांनी केली.
● शहरांतील खड्ड्यांवरून वातावरण गरम झालेले असताना, काँग्रेसने आता यात उडी घेतली आहे.
● खड्ड्यांमुळे आतापर्यंत २५ व्यक्तींचा मृत्यू झाला असून, त्याला सत्ताधारी जबाबदार असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली. या विरोधात आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिकमध्ये पुन्हा नवीन विधान केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा आदिवासी संस्कृती श्रेष्ठ असून, आपण या संस्कृतीचे जतन केले पाहिजे. सृष्टीतील पंचमहाभूतांना देव मानणाऱ्या या संस्कृतीचा विकास व्हायला हवा, असे आवाहन त्यांनी आदिवासी बांधवांना कार्यक्रमात केले.
हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस