नाशिक: पुढारी वृत्तसेवा – सध्या रस्त्यावर मोठया संख्येने इलेक्ट्रीक वाहने धावताना दिसत आहेत. भारतात ईव्ही क्षेत्राचा उदय वेगाने होत चालला आहे. शून्य उत्सर्जनाबरोबरच कमी इंधन खर्चामुळे भारतीयांना इलेक्ट्रीक वाहनांकडे आकर्षित करत आहे. शाश्वततेला अधिकाधिक प्राधान्य देत पर्यावरणाची जपणूक करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहनांची निवड करत असल्याची ७७ टक्के भारतीयांची धारणा आढळून आली आहे. यातून वाहन उद्योगात ग्रीन शिफ्ट चळवळीने वेग पकडला असून पर्यावरणासाठी ही अतिशय आनंददायी बाब ठरणार आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणि त्याचा वाहन विम्यावर होणारा परिणाम' हा इलेक्ट्रीक वाहन क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांचा वेध घेणारा संशोधन अहवाल आयसीआयसीआय लोम्बार्डने सादर केला आहे. भारतातील प्रमुख शहरांमधील ईव्ही मालकांचा दृष्टीकोन समजून घेत ग्राहकांचे बदलते वर्तन, नवनवीन प्रकारच्या जोखीम आणि बाजारातील नवीन प्रवाहांचा उलगडा या संशोधनातून झाला आहे.
कमी उत्सर्जनाबरोबरच कमी इंधन खर्चामुळे इलेक्ट्रीक वाहनांकडे वळण्याची प्रेरणा भारतीयांसाठी आकर्षक ठरली आहे. या अनोख्या संशोधनाने वाहन उद्योगक्षेत्रातील 'हरित क्रांती' मागील कारणे प्रकाशझोतात आणली आहे.
2070 पर्यंत नेट झिरो स्थिती प्राप्त करण्याचे भारताचे उद्दिष्ट असल्याने, ईव्ही मोबिलिटीमध्ये वाढ होणार आहे. 2030 पर्यंत सर्व वाहनांपैकी 70 टक्के वाहने ईव्ही प्रकारची असणार आहेत.
ग्राहकवादाकडून अतिसूक्ष्मतेकडे होत असलेला मानसिक बदल देश अनुभवत आहे आणि पर्यावरण संवर्धनाप्रति नागरिकांमध्ये उत्तरदायित्वात वाढ होतानाही दिसत आहे, -शीना कपूरस, आयसीआयसीआय लोम्बार्ड सीएसआर प्रमुख.
तब्बल 77 टक्के ईव्ही वापरकर्ते प्रदूषणकारी वायू उत्सर्जन कमी करण्याच्या आश्वासनाने प्रेरित झालेले आहेत. तरुण वाहनचालकांमध्ये, ही इको-चेतना 81 टक्क्यांपर्यंत वाढलेली आहे आणि ती वाढताना दिसत आहे. 73 टक्के वाहनमालकांनी इलेक्ट्रीक वाहनांकडे वळण्यासाठी कमी इंधन खर्च हा एक निर्णायक घटक असल्याचा मुद्दा स्पष्ट केला आहे.
ईव्ही वाहन खरेदीच्या मार्गातही काडी अडथळे आहेत. बॅटरी चार्जिंगसाठी लागणारा वेळ हा मुद्दा ६१ टक्के ईव्ही वाहनमालकांच्या चिंतेच्या यादीत सर्वात अग्रभागी आहे. मर्यादित ड्रायव्हिंग रेंज (५४ टक्के), चार्जिंगसाठी अपुऱ्या पायाभूत सुविधा (52%) यामुळे वाहन खरेदीत अडथळे येत आहेत. त्याचबरोबर प्रथमच कार खरेदी करणाऱ्यांसाठी ईव्ही वाहनांची भरमसाठ किंमत अडथळा ठरत आहे. किंमतीमुळे ईव्ही क्षेत्रात सतत नावीन्याची गरज अधोरेखित झाली आहे.
ईव्हीसाठी विम्यारुपी सुरक्षेबद्दल प्रचंड जागरूकता आढळली आहे. विशेषत: ईव्ही कारमालक विम्यारुपी सुरक्षाकवचाला भर देत आहेत. ग्राहकांना ईव्ही वाहन चालविताना कंपन्यांकडून क्षणोक्षणी सहाय्य मिळण्याची अपेक्षा आहे. बॅटरी रिप्लेसमेंटसह सर्वसमावेशक सुविधांसाठी ते गुंतवणूक तयार आहेत.
हेही वाचा: