Students are suffering academic losses due to vacant posts of teachers and non-teaching staff in government ashram schools.
कळवण (नाशिक) : कळवण व सुरगाणा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याविरोधात आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पालकांनी कळवण येथील प्रशासकीय इमारतीपुढे पाच तास तीव्र आंदोलन केले. १५ ऑगस्टपर्यंत शिक्षक व कर्मचारी भरती केली नाही, तर आश्रमशाळांना टाळे ठोकण्याचा इशारा देत पालकांनी आपल्या मुलांना घरी परत घेऊन जाण्याचे आवाहन केले.
शाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी शिक्षक व कर्मचारी नियुक्त झालेले नाहीत. या संदर्भात निवेदने, मागण्या, आंदोलन करूनही आदिवासी विकास विभाग, प्रकल्प अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने संतप्त पालक रस्त्यावर उतरले. या आंदोलनात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार, शालेय समिती सदस्य आणि आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जयश्री पवार यांनी, अनुदानित आश्रमशाळांमध्ये कधी आंदोलन होत नाही, मग शासकीय शाळांमध्येच का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी आदिवासी विकास विभागावर आदिवासींच्या नव्हे तर अधिकाऱ्यांच्या कल्याणासाठीच काम करत असल्याचा आरोप केला.
"कळवण प्रकल्पातील शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू असून १५ ऑगस्टपूर्वी नियमित शिक्षक आणि १०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती अप्पर आयुक्त कार्यालयामार्फत केली जाणार आहे"अकुनूरी नरेश, प्रकल्प अधिकारी , कळवण, नाशिक.
प्रशासनाने १५ ते २० दिवसांत शिक्षक उपलब्ध करून दिले जातील, असे तोंडी आश्वासन दिले. मात्र, आंदोलकांनी लेखी आश्वासनाची मागणी केली असता, प्रकल्प अधिकारी अनुकूरी नरेश यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि आपल्या दालनात जाऊन बसले. यामुळे संतप्त आमदार नितीन पवार यांनी थेट त्यांच्या दालनात प्रवेश करून जाब विचारला. यानंतर दिले गेलेले लेखी पत्र त्यांनी सार्वजनिकरित्या फाडत निषेध व्यक्त केला. प्रकल्प अधिकाऱ्यांनी संवादासाठी इंग्रजीचा आधार घेताच आमदार पवार यांनी "आय कॅन टॉक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश" असा चित्रपटातील डायलॉग म्हणत संताप व्यक्त केला. यावेळी आंदोलकांनीही जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला.