नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिकची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीत सध्या मोठ्या प्रमाणात पानवेली (जलवनस्पती) साचल्याने नदीचे पाणी हिरवेगार झाले आहे. गंगापूर गावापासून ते नांदूर-मानूरपर्यंत अनेक ठिकाणी पानवेलींचा प्रचंड फैलाव झाल्याचे दिसून येत आहे.
यामुळे नदीचे नैसर्गिक प्रवाह बाधित होत असून, जलचरांसाठी तसेच पाण्याच्या गुणवत्तेसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे. गोदाकाठावरही मोठ्या प्रमाणात पनवेली पसरल्याने नदीकाठाची स्वच्छता बिघडली आहे.
प्रदूषण नियंत्रणासाठी शासनस्तरावर मोठा गाजावाजा होत असताना आणि हजारो कोटींच्या योजना जाहीर झालेल्या असतानाही प्रत्यक्षात अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.
सांडपाणी, कचरा व अन्य प्रदूषक घटकांमुळे पानवेलीची वाढ वेगाने होत आहे. त्यामुळे गोदावरी स्वच्छतेसाठी ठोस नियोजन करून प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच नदीतील पानवेली तातडीने हटवावी, अशी मागणी नाशिककरांकडून होत आहे.