पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यात यंदाच्या नैर्ऋत्य मोसमी पावसाला सुरुवात झाल्यानंतर तब्बल ५८ दिवसांनी राज्याने ५० इंच (सुमारे १,२७० मिमी) एकूण पावसाचा टप्पा गाठला आहे. गेल्या वर्षी हा टप्पा अवघ्या ४० दिवसांत पार झाला होता. त्यामुळे यंदाचा पाऊस अद्यापही सरासरीपेक्षा लक्षणीय कमी असल्याचे चित्र आहे.
हवामान विभागाने ३१ जुलैपर्यंत गोव्यासाठी यलो अलर्ट कायम ठेवला आहे. राज्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा दिला आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण वेगवेगळे असून सांगे तालुक्यात सर्वाधिक ६८ इंच पाऊस झाल्याची नोंद आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत वाळपई येथे सर्वाधिक २८.११ मिमी पाऊस पडला आहे. त्यापाठोपाठ धारबांदोडा – २०.१ मिमी, साखळी – १७.४ मिमी, सांगे – १५.३ मिमी, म्हापसा – १४.३ मिमी, पेडणे – १२.४ मिमी, काणकोण – ११.२ मिमी, फोंडा – ८ मिमी, जुने गोवे - ५.६ मिमी, केपे – ५ मिमी, मुरगाव – २.४ मिमी, पणजी – २.२ मिमी तर मडगाव १ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
हवामान तज्ज्ञ आणि राष्ट्रीय सागर विज्ञान संस्थेच्या (एनआयओ) तज्ज्ञांनुसार, संबंधित कालावधीत गोव्यात ६३७.६ मिमी पाऊस झाला असून, या कालावधीची हवामानशास्त्रीय सरासरी १,११९ मिमी आहे. त्यामुळे राज्यात ३२ टक्के पावसाची तूट अजून कायम आहे. तुलनेत संपूर्ण भारतीय उपखंडातील पावसाची तूट सुमारे १६ टक्के आहे.
यंदा जून महिन्यातही अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला. जूनमध्ये ९०९ मिमी सरासरीच्या तुलनेत केवळ ६३२.२ मिमी पावसाची नोंद झाली. जूनमध्ये आठ दिवस पाऊस पडला नाही, तर जुलैमध्ये ११ ते १४ जुलै या सलग चार दिवसांत राज्यात केवळ २.७ मिमी पावसाची नोंद झाली. या हंगामातील सर्वाधिक एकदिवसीय पाऊस २२ जून रोजी ८९.५ मिमी, तर त्यानंतर २९ जून रोजी ८८.१ मिमी नोंदविण्यात आला. जुलै महिन्यात आतापर्यंतचा सर्वाधिक एकदिवसीय पाऊस २६ जुलै रोजी ५८.२ मिमी इतका होता.