नाशिक : उत्तर महाराष्ट्रात गणेश विसर्जन उत्सव उत्साहात साजरा होत असताना नाशिक आणि धुळे जिल्ह्यात पाच जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. धुळ्यात अन्य एका दुर्घटनेत ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटून ते विसर्जन मिरवणुकीत घुसल्याने एका महिलेसह चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेतील एका जखमी बालकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनांमुळे विसजर्नाला गालबोट लागले.
नाशिकला इंदिरानगर येथील घटनेत वालदेवी नदीपात्रात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर अन्य एका घटनेत अंबड येथे महाविदयालयीन युवकाचा गणेश विसर्जनावेळी चुंचाळे घरकुल भागातील खदानीत पडून मृत्यू झाला. नाशिकमध्ये दोन दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. धुळे तालुक्यातील बिलाडी गावात विसर्जनावेळी सख्खे भाऊ छोट्या धरणात बुडून मरण पावले. तर धुळ्यातील घटनेत गणरायाला उत्साहात निरोप देण्यासाठी मिरवणूक सुरू असतानाच शहरालगत असणाऱ्या चितोड गावात ट्रॅक्टर गर्दीत शिरल्याने तीन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. उपचारादरम्यान जखमी असलेल्या आणखी एका महिलेचा मृत्यू झाला. या चौघांवर बुधवारी (दि. १८) रात्री उशिरा चितोड परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.